उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला साथ देवून भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विकसित महाराष्ट्र आणि कोकण घडविण्यासाठी राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Pramod sawant
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला साथ देवून भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला – मुख्यमंत्री प्रमोद सावंत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

राजापूर: “पाच वर्षापूर्वी विधानसभेच्या झालेल्या निवडणूकीमध्ये शिवसेना-भाजप महायुती म्हणून निवडणूक लढवून आपण जिंकलो होतो. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला साथ देवून भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला.” अशा शब्दांमध्ये भाजपचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लोबोल करताना विधानसभा निवडणूकीमध्ये पुन्हा एकदा शंभर टक्के महायुतीच विजयी होईल असा ठाम विश्‍वास व्यक्त केला. ते शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरल्या नंतर घेण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.

विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र आणि कोकण घडविण्यासाठी राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण आलो आहोत. सामंत यांच्या पूर्णपणे पाठीशी भाजप ठामपणे असून ते भरघोस मताधिक्याने निवडून येतील असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरातील पाटीलमळा येथे झालेल्या सभेच्यावेळी व्यासपीठावर सावंत यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, महायुतीचे राजापूरचे उमेदवार किरण सामंत, प्रसिद्ध व्यवसायिक आर.डी.सामंत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अशफाक हाजू, दीपक नागले, प्रकाश कुवळेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्यने उपस्थित होते.

हेही वाचा : Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या घरात बंडखोरी, समीर भुजबळांनी निवडला वेगळा रस्ता!

यावेळी पुढे बोलताना सावंत म्हणाले की, “राज्यातील महायुती सरकारने नारीशक्ती, शेतकरी, लाडकी बहिण यांसह समाजातील विविध घटकांसाठी विविध योजना राबवून विकास साधला आहे. महामार्ग, मेट्रो यांसारखे विकासाला दिशा देणारे प्रकल्प राबविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत घडत असताना त्याच्यासोबत विकसित महाराष्ट्र आणि कोकण होण्यासाठी राज्यामध्ये महायुतीची सत्ता असणे गरजेचेे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीमध्ये सर्वसामान्य जनता विकासाला पर्यायाने महायुतीला निश्‍चितच साथ देणार आहे.” राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला असून रोडावलेल्या या विकासाला चालना देताना राजापूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीचे उमेदवार सामंत यांना साथ देण्याचे आवाहनही सावंत यांनी यावेळी केले. विकासापासून दूर राहीलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजापूरमध्ये परिवर्तन करण्याचे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी बोलताने केले. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधदूर्ग जिह्यातील सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील असा विश्‍वासही व्यक्त केला. यावेळी महायुतीचे उमेदवार सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्यासंख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa cm pramod sawant criticizes uddhav thackeray for alliance with congress css

First published on: 24-10-2024 at 19:46 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments