गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पार पडलं. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अणुशक्ती भवन तुर्भे (मुंबई) येथे गुरुवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रमेश बैस म्हणाले, राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत मला भेटायला येतात. त्यातील काहींना तर हिंदी भाषादेखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात; हिंदी भाषेत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी आहे.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध केंद्रीय संघटना, बँक आणि उपक्रमांना २०२२-२३ वर्षाचे क्षेत्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, राजभाषा विभागातील सचिव अंशुली आर्य, राजभाषा सहसचिव डॉ. मीनाक्षी जौली, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भुवन चंद्र पाठक तसेच राजभाषा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.
रमेश बैस म्हणाले, अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घरी देखील इंग्रजीतूनच संवाद करण्याचे सांगतात. हिंदी किंवा मराठी भाषेत बोलणाऱ्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाते. परिणामतः मुले आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत बोलण्यास कचरतात. जगात भारत एकमात्र देश आहे जिथे आपलीच राष्ट्रभाषा वाचवण्यासाठी समिती नेमावी लागते. इस्रायलने हिब्रू भाषा जीवित करुन तिला मातृभाषा बनवले. परंतु, आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनीदेखील हिंदी ही राष्ट्रभाषा न होता राज्यभाषाच राहिली आहे.
हिंदी भाषा येत नसेल तर त्याचा लोकांना न्यूनगंड येत नाही, परंतु इंग्रजी भाषा येत नसेल तर न्यूनगंड दिसून येतो असे सांगून देशांतर्गत विमान प्रवासात हिंदीचा वापर का केला जात नाही? याबद्दल रमेश बैस यांनी आश्चर्य व्यक्त केले. लॉर्ड मेकॉले यांनी देशावर थोपलेली वैचारिक गुलामगिरी जावी आणि हिंदी भाषा लोकभाषा व्हावी यासाठी हिंदी भाषेत इंग्रजीला पर्यायी असे सोपे शब्द उपलब्ध करून द्यावे अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.
भाषा ही राष्ट्राचा आत्मा असते : राज्यपाल
राज्यपाल म्हणाले, भाषा हा कोणत्याही राष्ट्राचा आणि समाजाचा आत्मा असतो, त्यातून तो देश संवाद साधतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो. आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या भूदान चळवळीच्या यशाचे श्रेय हिंदीला दिले होते. महात्मा गांधींनी ‘हिंदुस्थानी’ भाषेला सर्वोच्च स्थान दिले, असे सांगून जोपर्यंत लोक आपल्या मातृभाषेत विचार व्यक्त करीत नाहीत, तोवर कोणत्याही देशात स्वतंत्र विचारसरणीचा विकास शक्य होत नाही. भारतात बोलल्या जाणार्या सर्व भाषा या ‘राष्ट्रीय भाषा’च आहेत. भाषांमध्ये कोणताही संघर्ष नाही, तर त्या परस्परांना पूरक आहेत. सध्याच्या युगात प्रगतीसाठी तांत्रिक, वैज्ञानिक, व्यावसायिक आणि विविध विषयांचे अद्ययावत ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय भाषांमधील उच्च दर्जाच्या लेखनाला तसेच भाषांतराला प्रोत्साहन द्यावे लागेल.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. भाषेचा सर्वोत्तम विकास आणि प्रसार उत्स्फूर्तपणे आणि स्वेच्छेने होतो. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने मातृभाषेला प्राधान्य द्यावे.