अहिल्यानगरः सुपा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना वेठीस धरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे तक्रार केल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार लंके यांनी पत्रात म्हटले की, सुपा औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस वाढत असून नवनवीन उद्योग येत आहेत. सध्याच्या उद्योजकांना नाहक त्रास दिला जात आहे. या त्रासामुळे या वसाहतीमध्ये नव्याने येणाऱ्या उद्योगांवर परिणाम होणार आहे आणि हे असेच सुरू राहिले तर रोजगाराच्या संधींवर त्याचा गंभीर परिणाम होईल.

स्थानिक कामगार कंत्राटदारांचे परवाने कोणतेही ठोस करण न देता रद्द करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले उद्योग तसेच नव्या उद्योजकांना विनाकारण चुकीच्या नोटीस पाठवून दबाव टाकण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतीत कोणत्याही प्रकारचे गौण खनिज उत्खनन अनधिकृतपणे सुरू नसतानाही पालकमंत्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्योजकांवर चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्यासाठी करण्यास भाग पाडत आहेत. उद्योजकांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रामध्ये खा. लंके यांनी केला आहे.

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये जर असेच प्रकार सुरू राहिले तर सुरळीत असलेल्या व वाढत असलेल्या या औद्योगिक वसाहतीत भविष्यात नविन उद्योग येणार नाहीत. आहेत ते उद्योग बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक तिव्र होईल. याचा गांभीर्याने विचार करून संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी खा. लंके यांनी पत्राद्वारे केली आहे.