Gulabrao Patil on Ajit Pawar, Mahayuti & Maharashtra Assembly Election Results 2024 : एकीकडे महायुतीने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे महायुतीवर विरोधक टीका करत असतानाच महायुतीचे नेते देखील एकमेकांवर टीका करताना दिसू लागले आहेत. महायुतीमधील काही नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. “महायुतीत अजित पवार आमच्या मध्ये (भाजपा व एकनाथ शिंदेंची शिवसेना) नसते तर आमच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या”, असा दावा शिवसेनेचे (शिंदे) नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने (अजित पवार) उत्तर दिलं आहे. या पक्षाचे प्रवक्ते व विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी गुलाबरावांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी म्हणाले, “अजित पवार नसते तर शिंदे गटाच्या ९० ते १०० जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबराव पाटील यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मेहनत केली आहे. अडीच वर्षांमध्ये राज्यातील जनतेच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. मोठा नावलौकिक मिळवला आहे. अडीच वर्षांत आतापर्यंत कोणीही करू शकलेलं नाही ते काम एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं आहे. ते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ झाले आहेत. शेतकऱ्यांचे लाडके भाऊ झाले आहेत. तरुणांचे मित्र झाले आहेत. माय-बहिणींचा आशीर्वाद घेऊन ते लढत आहेत. त्यामुळे मला वाटतं की कोणीही एकनाथ शिंदेंवर टीका करणं उचित नाही”.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…

…तर आमच्या १०० जागा निवडणूक आल्या असत्या : गुलाबराव पाटील

राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “महायुतीमध्ये आमचा पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ८५ जागा लढला. त्यामध्ये आमचे ५७ उमेदवार निवडून आले. महायुतीत अजित पवार आमच्यामध्ये नसते तर आज शिवसेनेच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या. परंतु, महायुतीने अजित पवारांना सामावून घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही. अजित पवार महायुतीत आले म्हणून आमच्या नेत्यांनी (एकनाथ शिंदे) वरिष्ठांना तुम्ही अजित पवारांना का घेतलंत? असा प्रश्न विचारला नाही”.

हे ही वाचा >> “माजी सरन्यायाधीश चंदचुडांनी देशात आग लावली”, महाराष्ट्र व संभलचं उदाहरण देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप

गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करायचं सोडून एकनाथ शिंदे शेतीच्या नावाखाली गावी निघून गेले आहेत. हे अशोभनीय आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं. महालात राहणाऱ्यांना शेत काय कळणार? मातीशी जोडलेला माणूसच नेता होऊ शकतो. आम्ही सत्तास्थापन करूच. तुम्ही तुमच्या २० आमदारांकडे बघा. त्यातले १० जण इकडे येण्याचा विचार करत आहेत”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil shivsena would have won 100 seats without ajit pawar maharashtra assembly election 2024 asc