BJP Harshavardhan Patil Joined Sharadchandra Pawar NCP: कधीकाळी काँग्रेसचे इंदापूरमधील दिग्गज नेते गेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपामध्ये गेले आणि आता या निवडणुकांच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करण्याचं पाऊल उचललं आहे. एकीकडे निवडणुकांआधीच त्यांचे हे दोन्ही पक्षप्रवेश झाल्यामुळे राजकीय फायद्यासाठीच त्यांनी निर्णय घेतल्याची टीका आता महायुतीमधील काही पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. पण दुसरीकडे “हा जनतेचा उठाव आहे” असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी ‘लोकाग्रहास्तव’ पक्षबदल केल्याचं नमूद केलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्या निर्णयाचं समर्थन देखील केलं. आज इंदापूरमध्ये जंगी कार्यक्रमात शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“ही जनतेचीच इच्छा होती”

“इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा हा उठाव आहे. त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आपण प्रवेश करावा. त्यानुसार तो प्रवेश आज होतोय. माझ्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येनं पक्षप्रवेश करत आहोत”, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हर्षवर्धन पाटील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये! (फोटो – संग्रहीत छायाचित्र)

“एकतर जनतेचा आग्रह होता की तुम्ही इथून निवडणूक लढवली पाहिजे. दुसरं म्हणजे बऱ्याच निवडणुकांपासून आमच्या विचारांचे कार्यकर्ते या मतदारसंघात लोकप्रतिनिधी झाले आहेत. मागच्या निवडणुकीत आम्ही १५०० मतांनी जिंकता जिंकता राहिलो. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. म्हणून जनतेच्या आग्रहासाठी आम्ही शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

इंदापूरमधून उमेदवारी निश्चित?

दरम्यान, एकीकडे इंदापूरमधून निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह असल्यामुळेच निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं असताना दुसरीकडे उमेदवारी निश्चित झाली असं मात्र त्यांनी अद्याप ठामपणे सांगितलेलं नाही. “विधानसभा निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. माझ्या उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे असे सगळे मिळून घेतील”, असं ते म्हणाले.

‘भाजपात आल्यावर शांत झोप लागते’ म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा पक्षाला ‘राम राम’; त्या विधानाबाबत विचारताच म्हणाले…

झोपेच्या विधानाबाबत भाष्य

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे केलेल्या एका विधानामुळे बरीच चर्चा झाली होती. “भाजपामध्ये आल्यापासून आता चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते”, असं ते म्हणाले होते. त्यावरून आता त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. ‘इकडे हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागेल’ या संजय राऊतांच्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं की झोपेच्या संदर्भात एक गैरसमज झालेला दिसतोय. प्रत्येकाला लागेल तेवढीच झोप लागत असते. त्यापेक्षा काही अतिरिक्त झोप लागत नसते”, असं ते म्हणाले.