Hearing on Akshay Shinde Encounter Case : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबर रोजी चकमकीत मृत्यू झाला. या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकार आणि पोलिसांना सुनावले आहे. चार अधिकारी असतानाही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न कसा केला? स्वंसरक्षणाकरता त्याच्या पाय किंवा हातावर गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली? असे अनेकविध प्रश्न उपस्थित करून याबाबतचे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, हे एन्काऊंटर होण्याआधीच त्याच्या पालकांनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने पालकांकडे ५०० रुपये मागितले होते, असंही सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.

या सुनावणीच्या सुरुवातीलाच याचिकाकर्त्यांनी ठाणे पोलिसांनी एन्काऊंटरनंतर काढलेले प्रसिद्धी पत्रक वाचून दाखविले. यातील त्रुटी लक्षात आणून देताना त्यांनी या खटल्याचा तपास हत्या म्हणून कारावा अशी मागणी केली.

अक्षय शिंदेंच्या पालकांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “एन्काऊंटर होण्यापूर्वी अक्षयने पालकांकडे ५०० रुपये मागितले होते. जेणेकरून त्याला कँटिनमधून काही पदार्थ घेऊन खाता येतील. त्यावेळी त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो पळून जाण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्याच्या शरीरात तेवढी ताकदही नव्हती की तो पिस्तुल खेचू शकेल.” तसंच, आगामी निवडणुकांसाठी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली, असा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला असल्याचंही वकिलांनी कोर्टात सांगितलं.

एवढा निष्काळजीपणा का?

गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं.

हेही वाचा >> “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!

दोन गोळ्या कुठे गेल्या?

अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. अशाही प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.

अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही?

त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही, असंही न्यायमूर्ती म्हणाले.

जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल द्या

याप्रकरणातील जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे वैद्यकीय अहवालही कोर्टाने मागितले आहेत. तसंच, अक्षयने विशिष्ट अतंराने गोळीबार केला की पाँइट ब्लँक रेंज गोळीबार केला याचा फॉरेन्सिक अहवालही कोर्टाने मागवला आहे. तसंच, एका बाजूला गोळी लागून ती दुसऱ्या बाजूला कुठे गेली असा सवालही त्यांनी विचारला.

त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. याप्रकरणातील पुढील सुनावणी आता पुढच्या गुरुवारी होणार आहे.