कोणताही गाजावाजा न करता मध्यरात्रीपासून दुष्काळग्रस्त जत तालुक्याला पावसाने झोडपले. जत तालुक्यात एका रात्रीत ७३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुययाच्या सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील शेगाव परिसरात सर्वाधिक ९६.५ मिलीमीटर पाउस झाला.
दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असताना पावसाचे रविवारी रात्री पुनरागमन झाले असून जत तालुक्यात रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला. तालुक्यातील ९ मंडळापैकी सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली तर सर्वाधिक पाउस शेगाव मंंडळामध्ये ९६.५ मिलीमीटर नोंदला गेला. तर संख ७१.८, माडग्याळ ७१.५, मुचंडी ८३.३, उमदी ८३, डफळापूर ८९.५ मिलीमीटर झाला. जत ५०, कुंभारी ५७.८ आणि तिकोंडीमध्ये ६१.३ मिलीमीटर पाउस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>> “जालन्यातील आंदोलनात बाहेरचे घटक…”, शिंदे गटाचा आरोप नेमका कोणावर?
जिल्ह्यात अन्य तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी सकाळी आठवाजेपर्यंत नोंदला गेलेला पाउस असा मिरज २४.३, जत ७३.९, खानापूर २३.२, वाळवा १४.६, तासगाव १८.४, शिराळा २.६, आटपाडी १३.७, कवठेमहांकाळ २९.९, पलूस २१.४ आणि कडेगाव ७.६ मिलीमीटर इतका नोंदला गेला. एका रात्रीत जिल्ह्यात सरासरी ३८.७ मिलीमीटर पाउस झाला. मध्यरात्रीपासून जत तालुक्यात जोरदार पाउस कोसळत होता. या पावसाने तालुक्यातील अनेक ओढे, नाले यांना यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पाणी वाहते झाले. जिल्ह्यात पश्चिम भागापेक्षा दुष्काळी भागातील जतमध्ये पावसाचा जोर अधिक होता. आज दिवसभर ढगाळ हवामान असल्याने सुर्यदर्शन झाले नाही.