सोलापूर : आपल्या देशातील सभ्यता, संस्कृती, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा जाणीवपूर्वक नष्ट केला जात आहे. शाळा -महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी यातूनच घातली जाते, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या वैचारिक पाया सोडून दिल्याची टीका आझमी यांनी या वेळी केली. सोलापुरात शनिवारी आमदार आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजप व संघ परिवारावर जोरदार टीकास्त्र सोडले.   भाजप व संघ परिवाराने हिंदुत्ववादाच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण चालविले असताना दुसरीकडे बहुसंख्य हिंदु तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले जात आहे. चुकीच्या आणि आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे, असा आरोप त्यांनी केला.