अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत, असं वक्तव्यं छगन भुजबळ यांनी केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, “काही लोकांना सरस्वती तर काही लोकांना शारदा आवडते. परंतु, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. आम्ही कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.”

दरम्यान, ब्राह्मण महासंघाने छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. दवे म्हणाले, छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात भुजबळ यांचं हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचं धोरण का असतं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. तसेच भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावं.

आनंद दवे छगन भुजबळ यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी अशी का ठेवली नाही? तुम्ही ओबीसी समाजाचं राजकारण करताना मराठा समाजाला नावं का ठेवता? भुजबळ यांचं हे वक्तव्य मुर्खपणाचं आहे असं आम्ही (ब्राह्मण महासंघ) मानतो. अनेक जातींमध्ये शिवाजी आणि संभाजी अशी नावं असलेली वेगवेगळी माणसं आम्ही दाखवू शकतो. परंतु, येथे व्यक्तीशः उल्लेख करणं योग्य नाही. छगन भुजबळ तुम्हाला अशी नावं सापडली नाहीत तर आम्ही का देऊ.

हे ही वाचा >> “त्या कंडक्टरला लोळंस्तोवर मारेन”, एसटी आगार प्रमुखांना आमदार संतोष बांगरांची धमकी; म्हणाले, “पायाखाली…”

आनंद दवे अधिक आक्रमक होत म्हणाले, इतरांवर बोलण्याआधी छगन भुजबळ यांनी आधी स्वतःच्या घरातली नावं बदलावी. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचं नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा, त्यानंतर आमच्याशी बोला.

Story img Loader