राज्यातील बदल्यांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात आज मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दोन तास चौकशी केली. या प्रकरणी त्यांना या अगोदर मुंबई पोलिसांकडून नोटीस देखील पाठवण्यात आली होती, शिवाय बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. मात्र नंतर पोलीस आयुक्तांनी स्वत: फडणवीसांना फोन करून आम्हीच तुमच्या निवासस्थानी येतो असे सांगितले व त्यानुसार आज दुपारी १२ वाजता मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची टीम फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर आली होती. दरम्यान, फडणवीसांना आलेल्या नोटीसीवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने या नोटीसीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज राज्यभर आंदोलन करत, नोटीसीची जागोजागी होळी देखील केली. दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीसांना पत्रकार परिषद घेत माध्यमांना माहिती देखील दिली. त्यानंतर आता ट्वीटद्वारे देखील फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
“मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला, तरी मी थांबणार नाही. मी घोटाळे बाहेर काढतच राहणार. मी जनतेचे काम करतोय्, भ्रष्टाचार बाहेर काढतोय्, ते मी करीतच राहणार. मला अडकविण्याचे त्यांचे मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्देशून म्हटलं आहे.
मी बोललो नसतो, तर कोट्यवधींचा हा महाघोटाळा बाहेर आलाच नसता –
तसेच, “महाविकास आघाडीने पोलीस बदल्यांमध्ये जो महाघोटाळा केला, त्याची माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली होती.त्या प्रकरणात आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशी जाहीर केली. मी बोललो नसतो, तर कोट्यवधींचा हा महाघोटाळा बाहेर आलाच नसता.” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दोन तासांच्या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मला विचारलेले प्रश्न…”!
याचबरोबर, “महाविकास आघाडीचे भाजपा नेत्यांविरोधातील षडयंत्र नुकतेच विधानसभेत उघडकीस आणल्यानंतर अचानक मला काल हजर राहण्याची नोटीस आली. त्यानुसार, मी पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याची घोषणा सुद्धा केली. मात्र, नंतर सरकारनेच विनंती केल्याने पोलीस घरी आले. आधी मला काही प्रश्न पाठविण्यात आले होते. पण, आज घेऊन आलेल्या प्रश्नांमध्ये गुणात्मक अंतर होते. जणू मला आरोपी-सहआरोपी करता येईल काय, असे ते होते.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ऑफिशियल सिक्रसी अॅक्टनुसार मला आरोपी करता येईल काय, असा प्रयत्न होतोय –
तर, “मी एका जबाबदार नेत्यासारखे वागलो.जेव्हा हा घोटाळा उघडकीस केला, तेव्हा माध्यमांमध्ये घोषणा करून ही संपूर्ण माहिती-पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिले. कारण, महाविकास आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याचे पुरावे त्यांना देऊन काहीच उपयोग नव्हता. या संपूर्ण प्रकरणात मी ‘व्हीसल ब्लोअर’चे काम केले. मात्र, आता ऑफिशियल सिक्रसी अॅक्टनुसार मला आरोपी करता येईल काय, असा प्रयत्न होतोय. खरे तर जे पुरावे मी दिले नाहीत, ते मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिले आणि त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत.” असं देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे.