सातारा: महाराणी येसूबाई यांच्या मुत्सद्देगिरीमुळे मुघल सम्राट औरंगजेबाला कधी स्वराज्य जिंकता आले नाही. मात्र येसूबाईंच्या कर्तृत्व गाथेवर इतिहासाने म्हणावा तसा प्रकाश टाकला नाही अशी खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केली . महाराणी येसूबाई यांचे ४ जुलै १७१९ रोजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर साताऱ्यात आगमन झाले होते. हा दिवस येसूबाईंच्या आगमनाचा शौर्यदिन पाळला जातो. या निमित्त संगम माहुली येथील येसूबाईंच्या समाधी परिसरामध्ये अभिवादन कार्यक्रम आणि त्यांच्या वरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .

हा उपक्रम येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के व जिज्ञासा मंचचे निलेश पंडित यांच्या पुढाकाराने राबवण्यात येतो. यावेळी माहुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित व्याख्यान पर कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा : Video: अजित पवारांचं उत्तर वडेट्टीवारांना, पण रोख शरद पवारांवर? अर्थसंकल्प फुटल्याचा केला होता आरोप; म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”

घाडगे पुढे म्हणाले, येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या केवळ पत्नीच नव्हत्या तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या. ध्येयवादीपणा आणि राजकीय धुरंदरपणा हा त्यांच्यातील अंगभूत गुण होता. छत्रपती शिवरायांच्या आणि महाराणी जिजाऊ महाराजांच्या छायेमध्ये वावरत असताना त्यांनी स्वराज्याविषयीची निष्ठा आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचे सत्व अंगी बाणवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर स्वराज्याचा पुढील छत्रपती घडविण्यासाठी त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवले. इतिहासामध्ये त्यांनी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला. छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरमरणानंतर जो मुत्सद्दीपणा दाखवला त्याला इतिहासात तोड नाही.

हेही वाचा : राज ठाकरेंचा शिलेदार आता उद्धव ठाकरेंसोबत; वसंत मोरेंचा तीन महिन्यांत प्रकाश आंबेडकरांना ‘जय महाराष्ट्र’!

औरंगजेबासारख्या मोगल सम्राटाच्या कैदी मध्ये २९ वर्ष काढणे ही त्यांच्या सत्वगुणांची परीक्षाच होती. मात्र येसूबाईंनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळत हे संकट निभावले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वावर इतिहासकरांनी म्हणावा तसा प्रकाश टाकला नाही. महाराणी येसूबाईंनी स्वराज्यासाठी केलेला हा त्याग आजच्या पिढीला माहित नाही . येसूबाईंच्या जीवनाविषयी इतिहासामध्ये अत्यंत तुटपुंजी माहिती उपलब्ध व्हावी हे दुर्दैवी आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी येसूबाईंच्या समाधीला अभिवादन केले. निलेश पंडित व सुहास राजेशिर्के, यांनी स्वागत केले. कार्यक्रमास माहुली गावचे उपसरपंच अविनाश कोळपे, सदस्य प्रकाश माने, मुख्याध्यापक एसव्ही काटकर, मंगलसिंग मोहिते, पुजारी संकपाळ, चिंचणीचे एसके जाधव, जयंत देशपांडे , लीलाधरराजे भोसले, सुभाष राजेशिर्के, योगेश चौकवाले, दिलीपराव गायकवाड आदी उपस्थित होते.