मी बातम्यांसाठी आंदोलनं करत नाही, लोकांना सोयी सुविधा मिळाव्यात हा आंदोलनांमागचा उद्देश असतो. देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, अन्यथा हा फक्त ठाण्याच्या टोलनाक्यावर वाढलेल्या पाच रुपयांचा विषय होता. २०२६ पर्यंतचा करार आहे हे मला तेव्हाच माहित होतं असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. टोलच्या मुद्द्यावर दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राज ठाकरे?

टोलप्रश्नासंदर्भात सरकारने एक महिन्याची मुदत घेतली आहे. त्या मुदतीत जर सरकार आश्वासन पूर्ण करु शकलं नाही तर तुम्ही काय करणार? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “मी बातम्यांसाठी आंदोलन करत नाही. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून आंदोलन करतो. आत्ता मी जे काही केलं त्याचं वार्तांकन कशा पद्धतीने होणार हे पण मला माहित आहे. मला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचीही उत्तरं मी काढून ठेवली आहेत. मला वाटतं आपण या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. ज्या ठिकाणी जी गरज असेल त्याप्रमाणे आंदोलनं होतील.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- टोलसंदर्भात सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय; राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितली मुद्देसूद माहिती!

टोलचे पैसे जातात कुठे?

टोलनाक्यांवरही आपण पाहिलं की कुठलेही ट्रक कुठल्याही लेनमध्ये शिरतात आणि ट्रॅफिक जाम होतो. त्यामुळे टोलवरती निर्णय झाला की या सगळ्या गोष्टींना शिस्त लागेल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज्याचा महसूल हा महत्त्वाचा विषय आहे. आपला विषय हा आहे की रोड टॅक्स भरल्यानंतर या सगळ्या गोष्टी जातात कुठे? आपल्या पैशांच्या मोबदल्यात आपल्याला स्वच्छतागृहं पण मिळणार नसतील तर मग त्या गोष्टींचा काय उपयोग आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मी मागची नऊ वर्षे ज्या सूचना करायच्या आहेत त्या केल्या. आता पुन्हा एकदा हा विषय समोर आला, फडणवीस यांचं वक्तव्य आलं त्यानंतर हा सगळा विषय झाला.

मी ९ वर्षांनंतर सह्याद्री अतिथीगृहात गेलो

“काल ९ वर्षांनंतर मी या विषयासाठी सह्याद्री अतिथीगृहात गेलो. तेव्हा सह्याद्रीवर पृथ्वीराज चव्हाण होते. तेव्हा काही गोष्टी ठरल्या, त्या सुरू झाल्या. पण नंतर त्यातल्या गोष्टी मागे पडल्या. तेव्हाच मला कळलं होतं की टोलसंदर्भातले सरकारी करार २०२६मध्ये संपत आहेत. पण त्यात सुधारणांच्या सूचना मी केल्या होत्या. मग ९ वर्षांनंतर पुन्हा तो विषय ऐरणीवर आला. कारण ठाण्यातल्या ५ एंट्री पॉइंट्सवर पैसे वाढवले गेले. अविनाश जाधव वगैरे आमचे सहकारी उपोषणाला बसले आणि तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. फडणवीसांनी म्हटलं की महाराष्ट्रात कोणत्याच टोलवर चारचाकी, तीनचाकी वाहनांना टोल नाहीये. त्यानंतर सगळीकडे चलबिचल सुरू झाली. मग फक्त टोल वसूल करणाऱ्यांकडेच टोल जातोय की काय? त्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली”, असं राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I do not protest for news i do it to solve people problems said raj thackeray scj