Eknath Khadse on NCP Quit : भाजपातून राष्ट्रवादी गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर होते. परंतु, त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याने त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, त्यांनी आता मोठा दावा केला आहे. मी राष्ट्रवादी सोडलीच नव्हती, असं एकनाथ खडसे म्हणाले. जामनेरमध्ये त्यांनी आज भव्य सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

“गेल्या ३५ वर्षांत जामनेर शहरात आणि तालुक्यात शेकडोने माझ्या सभा झाल्यात. पण गेल्या ३५ वर्षांत एवढी मोठी सभा झाली नाही. स्वयंस्फुर्तीने लोक येथे उपस्थित राहिले. या ठिकाणी परिवर्तन हवंय असं सांगितलं गेलं. ही खऱ्या अर्थाने परिवर्तन सभा आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“भाजपाकडे मी का वळलो असं सगळे विचारायला लागले. परंतु, मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती, मी भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपातून या असं आमंत्रण होतं. हे आमंत्रण कसं होतं हे जयंत पाटील आणि शरद पवारांनाही माहितेय”, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.

हेही वाचा >> Raj Thackeray : “बिल्डरसारख्या अवलादींना हेच हवं असतं”, वरळी व्हिजनमध्ये राज ठाकरेंनी सांगितलं टाऊन प्लानिंगचं महत्त्व!

…म्हणून गिरीश महाजनांचा नंबर लागला

“३५ वर्षांपूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉ. मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी मी ३५ वर्षांपासून येथे येत होतो. नंतर गिरीश महाजन सरपंच होते. त्या कालखंडात हा मतदारसंघ बदलवण्यासाठी भाजपाने घेतला. भुसावळचा शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाजनांचा नंबर लागला”, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

गिरीश महाजन माझ्या हाता-पाया पडले होते

ते पुढे म्हणाले, “२००९ ला गिरीश भाऊ माझ्याकडे आले, भाऊ त्यांचा काय जनसमुदाय होता, माझं काही खरं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. असा रडायचा, पाया पडायचा. मी म्हणालो मी काय करू शकतो? शत्रूघ्न सिन्हांची सभा आहे, ते तुमचे मित्र आहेत. त्यांना सांगा जामनेरला सभा घ्या. जामनेरला मोठी सभा घेतो आणि सर्व पाणी फिरवतो. त्यानुसार आम्ही जामनेरला शत्रुघ्न सिन्हांची सभा घेतली. या सभेमुळे वातावरण बदललं म्हणून पाच हजारांनी ते निवडून आले.”

“जामनेरमध्ये ज्या कालखंडात भाजपा नव्हता, त्या भाजपाला जामनेरमध्ये बसवला आणि आता ते माझ्या डोक्यावर बसलेत”, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.