सावंतवाडी : उध्दव व राज ठाकरे बंधू एकत्र आले तर पुढच्या पाच वर्षात पुन्हा “ठाकरे सरकार” राज्यात येईल असा विश्वास उबाठाचे माहीम मुंबईचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,संपूर्ण मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्या नंतर स्वागताचे बॅनर झळकले आहेत.फळ पिक विमा योजनेबाबत तहसीलदार कार्यालयात जाब विचारण्यासाठी आमदार महेश सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत आले होते त्यावेळी ते बोलत होते. त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले तर पुढच्या पाच वर्षात राज्यात ठाकरे सरकार येणार आहे. मी गेले दोन-तीन दिवस गावात आहे. त्यामुळे मला मुंबईची माहीत नसली तरी बातम्या बघतो आहे संपूर्ण मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर स्वागताचे बॅनर झळकले आहेत. उद्धव व राज ठाकरे एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मराठी माणसाला न्याय हक्क मिळेल. मराठी माणसाला न्याय हवा असेल तर ठाकरे बंधू एकत्र यायला हवेत असे शिवसैनिकांना वाटते.
ते म्हणाले, भाजपचे सध्या वर्गीकरण सुरू आहे, त्यात मतांचेही वर्गीकरण सुरू आहे. भाजप महाराष्ट्र राज्यातील नावाजलेल्या घरातच बिमोड करत आहे.राजकीय दृष्ट्या नावाजलेल्या घरातच भाजपने दोन भाग केल्याचे आपण पाहतोय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची काळाची गरज आहे.
आमदार सावंत म्हणाले,उद्धव व राज ठाकरे हे माझ्यात मतदारसंघात येतात, ते दोघे एकत्र आले तर आम्हा शिवसैनिकांना आनंदच होईल. यावेळी उबाठा चे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रमेश गावकर, यशवंत परब आदी उपस्थित होते.