लातूर -केंद्र सरकारने वाटाण्यावरील आयात शुल्क शून्य टक्के ची मर्यादा ३१ मे पर्यंत वाढवली आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत ती होती त्याला आता तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे बाजारपेठेतील हरभऱ्याचे भाव वाढण्याची सुतराम शक्यता नाही .हमीभावापेक्षा कमी भावाने हरभरा विकला जातो आहे .केंद्र सरकारच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध नाही ,नोंदणी नाही त्यामुळे बाजारपेठेत जो भाव मिळतो आहे त्या भावाने शेतकऱ्याला हरभरा विकावा लागतो आहे .हरभऱ्याचा हमीभाव आहे ५६५०प्रतिक्विंटल व बाजारपेठेत ५००१रुपये ते ५२०० रुपये असा भाव आहे.

हमीभावापेक्षा पाचशे रुपये पेक्षा कमी भावाने शेतकऱ्याला शेतमाल विकावा लागतो आहे .गेल्या काही वर्षापासून डाळीवरील आयात शुल्क शून्य टक्के करण्यात आल्यामुळे सर्व डाळवर्गीय पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. तुर ,उडीद, मूग यांना असा फटका बसल्यानंतर आता हरभऱ्याला हमीभाव पेक्षा कमी भाव मिळतो आहे.

केंद्र सरकार आयात शुल्क वाढवेल व हरभऱ्याला तरी बाजारपेठेत हमीभाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सरकारने २८फेब्रुवारी पर्यंत आलेल्या आयात मालाला शून्य टक्के आयात कर व तो माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ३१ मे पर्यंत ची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत बाजारपेठेतील हरभऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता नाही. आत्तापर्यंत यावर्षी एकतीस लाख टना पेक्षा अधिक वाटाणा आयात झाला आहे गरजेपेक्षा अधिक माल बाजारपेठेत दाखल झाला असल्यामुळे देशांतर्गत हरभऱ्याचे भाव पडलेले आहेत.