अहिल्यानगरः आधारभूत किंमतीच्या खरेदी योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीच्या १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे. ९ केंद्रावरून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. सन २०२४-२५ मधील हंगामासाठी तूर पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दराने दि. १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील ९ केंद्रावरून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

शेवगाव तालुक्यात सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी (बोधेगाव), पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था बाजार समिती (पाथर्डी), श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी (घारगाव), रिअल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (घुटेवाडी) व जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी (मांडवगण), राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (राहुरी), पारनेर तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती (पारनेर), कोपरगाव तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती (कोपरगाव) व जामखेड तालुक्यात चैतन्य कानिफनाथ फळ प्रक्रिया सहकारी संस्था (खर्डा उपबाजार समिती) येथे नोंदणी करण्यात येईल.

सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि तूर पिकाची नोंद असलेला ऑनलाईन पीकपेरा व चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करुन सुकवून माल केंद्रावर आणावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

नाफेड किंवा एनसीसीएफच्या गुणवत्तेनुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मोबाईलवरज एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल. देण्यात आलेल्या तारखेसच शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात यंदा तुरीचे क्षेत्र ५२ हजार हेक्‍टरवर गेले होते. वेळेवर झालेल्या पावसाने तुरीचे क्षेत्र वाढले होते. हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करावे, यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला होता.