अहिल्यानगर : जिल्ह्यातील सहकारी १३ सहकारी व खासगी ९ अशा एकुण २२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८९ लाख ३७ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. तर ७७ लाख ४४ हजार ६४३ क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन केले आहे. गाळप सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अगस्ती, अशोक, वृद्धेश्वर, केदारेश्वर यासह ७ कारखान्यांना ऊस उत्पादकांची ५० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी थकवली आहे. कर्मवीर काळे, मुळा, सहकारमहर्षी थोरात व साईकृपा या चारच कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ अदा केली आहे.
यंदाच्या गाळप हंगामास ऊसाची कमतरता भासेल असे वाटप असतांना हंगाम जोमाने सुरू आहे. या सर्व २२ कारखान्यांकडून १ हजार ८९८ कोटी ७७ लाख ९२ हजार एफआरपी रकमेचे वाटप होणे आवश्यक असतांना १ हजार ४६४ कोटी ३३ लाख ९ हजार रुपयांच्या एफआरपीचे वाटप झाले आहे. ४३४ कोटी ४४ लाख ८३ हजारांची एफआरपी रक्कम थकवली आहे.
सर्वात कमी केदारेश्वर कारखान्याने अवघी २५.०८ टक्के एफआरपीचे वाटप केले, साजन शुगरनेही २५.८६ टक्के, श्री स्वामी समर्थ कारखान्याने २८.०८ टक्के एफआरपीचे वाटप केले आहे. वृद्धेश्वर कारखान्याने ३५.६२ टक्के, गजाजन कारखान्याने ४६.६८ टक्के, अशोकने ४५.९० टक्के, अगस्तीने ४९.५० टक्के, डॉ. विखे पाटील कारखान्याने ५०.०८ टक्के एफआरपीचे वाटप केले आहे.
ऊसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत शेतकर्यांना एफआरपीची रक्कम अदा होणे आवश्यक असतांनाही केवळ चार कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपीची रक्कम अदा झाली आहे. उर्वरित ८ कारखान्यांकडून ५० टक्केपेक्षाही कमी एफआरपीचे वाटप केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. साईकृपाने ११९.७९ टक्के तर थोरात कारखान्याने ११५ टक्के म्हणजे शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त एफआरपी रक्कमचे वाटप केले आहे.
मुळा व काळे कारखान्याने शंभर टक्के वाटप केले आहे. अन्य कारखान्यामध्ये ज्ञानेश्वरने ७५.५७ टक्के, गणेश ८९.५३ टक्के, नागवडे ८३.६८ टक्के, कोल्हे ८२.५७, इंडियन ६५.७३, जयश्रीराम ६३.६४, क्रांतीशुगर ६६.८०, धुमाळ ९३.५६ टक्के एफआरपीचे वाटप केले आहे.
काही साखर कारखान्यांनी एफआरपी अदा केली आहे. पण ती करतांना केवळ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांची पीक कर्जाची रक्कम जमा केली आहे. मात्र शेतकर्यांची उर्वरित रक्कम काही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली नसल्याचे समजले. सेवा सोसायट्यांची शंभर टक्के वसुली दाखवितांना शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये मात्र अजूनही एफआरपीची रक्कम जमा झालेली नाही. १५ डिसेंबरपर्यंत शेतकर्यांना पैसे मिळाले आहेत. त्यानंतर दोन महिने झाले तरी अद्यापही शेतकर्यांची बँक खाती रिकामीच आहेत. सोसायट्यांच्या वसुलीसाठी पीक कर्जाची रक्कम कारखान्यांनी लगेच जमा केली. पण शेतकर्यांना अजूनही ताटकळत ठेवले आहे.