अहिल्यानगरः ठिबक सिंचन योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षात अनुदान मिळालेले नाही. ठिबक सिंचन अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांची संख्या ६ हजार ३२७ आहे. या शेतकर्यांना सुमारे १७ कोटी ८७ लाख ११ हजार ३२ रुपयांच्या अनुदानाची प्रतिक्षा आहे. जिल्हा कृषी विभागाकडून ही आकडेवारी उपलब्ध झाली.
उपलब्ध पाण्याचे नियोजन करून जमिनीची सुपकता वाढविण्यासाठी ठिबक सिंचन योजना राबवली जाते. केंद्र व राज्य शासनाचा ६०-४० टक्के हिस्सा असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेतून, ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून शेतातील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केल्यानंतर शेतकर्यांना खर्चाच्या सुमारे ८० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. यामध्ये पिकानिहाय अनुदानाच्या रकमेत बदल आहे.
एकरी २५ ते ३० हजारांचे अनुदान शेतकर्यांना देण्याची तरतूद आहे. ऑनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर पाहणी करून प्रस्तावास मंजुरी मिळते. यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यावर शेतकरी भर देतात. मात्र गेल्या दीड वर्षापासून शेतकर्यांना ठिबक सिंचन योजनेतून अनुदान देण्यात आलेले नसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात ६ हजार ३२७ शेतकर्यांना ठिबक सिंचनचे अनुदान मिळणे बाकी आहे. सध्या निधी उपलब्ध नसल्याने अनुदान मिळण्यात व्यत्यय येत आहे. गेल्या काही वर्षापासून कृषी अनेक योजनांचे अनुदान शेतकर्यांना वेळत उपलब्ध होत नाही. ठिंबक सिंचनाकडे शेतकर्यांना कल वाढू लागला आहे. मात्र अनुदान वेळेत मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. तालुकानिहाय रखडलेले अनुदान व शेतकरी संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात शेतकरी संख्या-
अहिल्यानगर- (१८७) शेतकरी ३२ लाख ५५ हजार ८५० रु. अनुदान, पारनेर- (१६०) ३८ लाख ७४ हजार १२, पाथर्डी- (३५१) ७४ लाख १० हजार ८१९, कर्जत- (४१३) १ कोटी २५ लाख ९२ हजार ७२, जामखेड- (३४४) ५० लाख २७ हजार ८६३, श्रीगोंदा- (५४७) १ कोटी २६ लाख ३३ हजार ८४१, श्रीरामपूर- (४२८) १ कोटी ३९ लाख २९ हजार ३९३, राहुरी- (४३९) १ कोटी ५३ लाख ९५ हजार ४८१, नेवासा- (१०३५) ४ कोटी १२ लाख ८३ हजार ३९६, शेवगाव- (६३९) २ कोटी ७२ लाख ३५ हजार ९२२, संगमनेर- (३४५) ८७ लाख ६९ हजार ५२, अकोले- (१३९) ३८ लाख ९ हजार ७७४, कोपरगाव- (५६०) १ कोटी २ लाख ६३ हजार २०६, राहाता- (७३९) १ कोटी ३२ लाख ३० हजार ३३ रुपये.