कर्जत : वडिलांच्या अंत्यविधीला का बोलवले नाही असे म्हणून दोन भावांमध्ये वाद झाला आणि यामध्ये विकास दिलीप चिंधे (वय – तीस वर्षे) या युवकाचा डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी बुद्रुक या गावामध्ये घडली. याप्रकरणी यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे/चिंधे यास पोलिसांनी अटक केली आहे.

मयत विकास शिंदे हा लातूर येथे खून करून फरार झालेला आरोपी होता. याबाबत घडलेली घटना अशी की, रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता राक्षसवाडी बुद्रुक येथे विकास दिलीप चिंधे व यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे हे दोघे सख्खे चुलत भाऊ प्रथम दारू प्यायले. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये मयत विकास दिलीप चिंधे हा त्याचे वडील दिलीप सयाजी चिंधे यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यावेळी मला न कळवता तुम्ही त्यांचा अंत्यविधी का केला. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादा मधून दोघांनी एकमेकांना चांगलाच चोप दिला. दोघेही दारूच्या नशेत होते. या वादानंतर ते दोघेही त्याच ठिकाणी झोपले. मात्र आपल्याला विनाकारण मारहाण झाली याचा राग आलेला आरोपी यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे याने दिलीप चिंधे हा झोपलेला असताना याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्यास जागीच जीवे ठार मारले.

हेही वाचा : Sharad Pawar : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “आम्ही…”

मयत दिलीप चींधे याच्यावर लातूर येथे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला संभाजीनगर येथे जेलमध्ये ठेवण्यात आलेले होते. करोना काळामध्ये दिलीप हा जेलमधून पॅरोल वर गावी राक्षस वाडी बुद्रुक येथे आला होता. मात्र परत तो जेलमध्ये गेलाच नाही तेव्हापासून फरार होता. आणि आज तो पोलिसांना जेव्हा मिळाला तेव्हा त्याचा खून झालेला होता. दरम्यान या प्रकरणी आरोपी यशवंत उर्फ पप्पू शांतीलाल शिंदे हल्ली राहणार बेलवंडी तालुका कर्जत यास पोलिसांनी अटक केली असून दत्तात्रय बाळू थोरात राहणार राक्षसवाडी बुद्रुक यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.