कर्जत: “कुत्र्याला काही दिवस बाहेर सोडू नका”, असे म्हटल्याचा राग आल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना कर्जत तालुक्यातील हंडाळवाडी येथे घडली आहे. या घटनेची कर्जत पोलीस दखल घेत नसल्यामुळे रामदास भागोजी बंडगर यांनी या प्रकरणी थेट अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली असून त्यांच्याकडून न्याय मिळावा अशी मागणी बंडगर यांनी केली आहे.

रामदास बंडगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी लेखी अर्ज दिला असून त्यात त्यांनी सर्व घटनाक्रम लिहिला आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान एका इसमाचा पाळीव कुत्रा हा रामदास बंडगर यांच्या शेतामध्ये येऊन ज्वारीच्या उभ्या पिकामंध्ये माती पायाने उकरून व खड्डे करुन नुकसान करत होता. त्यामुळे रामदास बंडगर यांनी त्या व्यक्तीला, “काही दिवस कुत्रा घराच्या परिसरातच बांधून ठेवा. त्याला बाहेर सोडू नका. आमच्या पिकांचे नुकसान होत आहे”, अशी विनवणी केली. याचा राग आल्याने काही संबंधितांनी रामदास बंडगर यांना लाकडी काठीने पाठीवर व तोंडावर लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या मोटारसायकलचे नुकसान केले. यावेळी प्रसंगावधान राखत रामदास बंडगर यांनी हाता पाया पडून विनवणी करून स्वतःचा जीव वाचवला आणि मोटरसायकलवरून पळ काढला. तरी देखील पुन्हा पाठीमागून काही व्यक्तींनी दगड मारत त्यांचा पाठलाग केला. रामदास बंडगर हे जीव वाचवून स्वतःच्या घरी कसेबसे पोहोचले.

हेही वाचा : Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

यानंतर या सर्व प्रकाराबाबत बंडगर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी अर्ज दिला. त्यात त्यांनी मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सर्व दहा जणांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. पोलिसांनी चार जणांवर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या जीवितास धोका असून ते लोक कधी पण मला घरात घुसून मारून टाकतील. त्यामुळे मला घरामध्ये जाण्याची देखील भीती वाटत आहे, असे रामदास बंडगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे.