पालघर : पालघर जिल्ह्याला ११२ किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या किनाऱ्यावर ९ ऑक्टोबर पासून पोलिसांकडून होणारी सागरी गस्त बंद आहे. या सागरी सुरक्षिततेसाठी खाजगी बोटीची उपलब्धता व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयातून प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला असून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे देशासाठी संवेदनशील असणाऱ्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून तसेच राष्ट्रीय सुरक्षितता वाऱ्यावर पडल्याचे दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२६/११ दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण होत असताना सागरी सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तसेच जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. जिल्हा प्रशासनाकडे स्वतःची गस्ती यंत्रणा नसल्याने खाजगी मालकीच्या बोटी समुद्रात गस्त (पेट्रोलिंगसाठी) वापरण्यात येतात. यंदाच्या सागरी हंगामामध्ये ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर यादरम्यान पोलिसांनी खाजगी बोटीच्या मार्फत समुद्रामध्ये पहारा देण्यात आला. मात्र वर्षाला १०० दिवस पेट्रोलिंग करण्याची निविदे मधील तरतूद संपुष्टात आल्याने तेव्हापासून समुद्र सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: सामान्यांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त!

पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अनुसंशोधन केंद्र तसेच डहाणू येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्प समुद्र किनारी वसलेला असून त्याखेरीज तारापूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये १३०० उद्योग कार्यरत आहेत. रेल्वे तसेच महामार्गाच्या सहजगत उपलब्धतेमुळे पालघर जिल्ह्यातून प्रवेश घेऊन मुंबईपर्यंत पोहोचणे सहजगत शक्य आहे अशा परिस्थितीत सागरी किनारा गस्तीविना राहिल्याचे दिसून आले होते.

सागरी गस्तीसाठी नव्याने निविदा काढण्याबाबत प्रस्ताव पोलीस मुख्यालयातून मंत्रालयात मंजुरीसाठी देण्यात आला असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरवर्षी १०० दिवस गस्ती घालण्याऐवजी पावसाचा काळ वगळता किमान २४० दिवस सागरी गस्ती घालण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती या प्रस्तावामध्ये करण्यात आल्याचे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.

हेही वाचा : “लोकसभेला भाजपा २६, तर शिंदेंची शिवसेना अन् अजित पवार गट…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

कशी होती गस्तीची व्यवस्था

पालघर पोलीसांनी निविदा काढून दोन बोटी समुद्री गस्तीसाठी कार्यालयात ठेवल्या होत्या. एका समुद्री नौकेद्वारे सातपाटी ते बोर्डी व दुसऱ्या बोटीद्वारे सातपाटी ते अर्नाळा यादरम्यान पाच नॉटिकल मैल अंतरापर्यंत दिवसा गस्ती केली जात. प्रत्येक गस्ती नौकेमध्ये दोन-तीन पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच चार ते पाच खलाशी सोबत असतात. पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याची लांबी पाहता या भागासाठी किमान तीन ते चार बोटी गस्ती कामी अहोरात्र कार्यरत असणे आवश्यक असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar district maritime patrol closed for one and a half months css