अलिबाग: रायगड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ११ जणांचा वर्षासहलीं दरम्यान मृत्यू झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. पर्यटकांच्या अतिउत्साह आणि निष्काळजीपणामुळे वर्षा सहली जिवघेण्या ठरत आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.

जुन महिन्याच्या सुरवातीला उरण तालुक्यातील पिरकोन येथे दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आंळदी येथून आलेला एक पर्यटक आधी बुडाला. २१ जूनला रिझवी महाविद्यालयातील चार पर्यटकांचा खालापूर तालुक्यातील धरणात मृत्यू झाला. २२ जूनला महाड येथे दोन जण बुडाले. २३ जूनला अलिबाग तालुक्यातील मुनवली तलावात पोहण्यासाठी आलेली दोन मुलं दगावली. या शिवाय माथेरान येथे पेब किल्ल्यावर ट्रेकींगसाठी एक पर्यटक तरुणी दरीत पडून गंभीर जखमी झाली. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे.

हेही वाचा : लक्ष्मण हाकेंचा ताफा मनोज जरांगेंच्या गावात पोहोचताच दगडफेक, दोन गट आमने-सामने; गावात तणावपूर्ण शांतता!

जिल्ह्यात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. दरवर्षी हजारो पर्यटक वर्षासहलींसाठी रायगड जिल्ह्यात दाखल होत असतात. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, रोहा, माणगाव, सुधागड पाली, महाड आणि पोलादपूर येथील पर्यटनस्थळांचा समावेश असतो. मात्र पावसाचा जोर वाढल्यास या धरणामधून आणि धबधब्यांमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात.

समुद्र किनाऱ्यावरील परिस्थिती काहीशी वेगळी असते. पर्यटकांना समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीचा अंदाज नसतो. याशिवाय पाण्यातील आंतर्गत प्रवाहांची माहिती नसते. स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक खोल पाण्यात उतरतात आणि नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात.

ही परिस्थिती चिंताजनक असते. निसर्गाचा आनंद लुटतांना स्वताचे जीव धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेणे गरजेच आहे. स्थानिकांच्या सूचनांचे गांभिर्याने घेणे अभिप्रेत आहे. मात्र बरेचदा पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्घटना घडतात.

हेही वाचा : साताऱ्याच्या राजवाडा परीसरातील अतिक्रमण पालिकेने हटविले

या दुर्घटना का घडतात…

पर्यटकांचा आततायीपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परीस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटन आणि त्यावर आधारित व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

हेही वाचा : “लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती चांगली”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे आवश्यक आहे. यासाठी तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. मात्र त्याच वेळी पर्यटकांनी स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करू नये, निष्काळजी पणा टाळावा.

किशन जावळे (जिल्हाधिकारी रायगड)