अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्स स्मार्ट झाली आहेत. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामुळे पोलिसांच्या कामकाजाला आता तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आणि बाह्यरंग रुपात मोठे बदल करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे कामाकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे. त्याचबरोबर पोलीस दलाचे कामकाज ऑनलाईन आणि पेपरलेस होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्य नागरीक पोलीस ठाण्याची पायरी सहसा चढण्यास धजावत नाहीत. अतिशय नाईलाज झाला तरच ते पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात. कारण पोलीसांकडून मिळणारी वागणूक यास कारणीभूत ठरते. बरेचदा तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तींकडून पोलीसांकडे संशयाच्या नजरेनी बघितले जाते. पण जनसामान्यातील पोलीसांची ही प्रतिमा बदलण्याचे काम रायगड पोलीसांनी सुरू केले आहे.

हेही वाचा : “मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं, सरकार…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

पोलीस प्रशासन लोकाभिमूख व्हावे, पोलीस ठाण्यांचे वातावरण प्रसन्न असावे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता यावी, ऑनलाईन आणि पेपरलेस कारभार व्हावा यासाठी आता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्मार्ट केली गेली आहेत. लवकरच या स्मार्ट पोलीस ठाण्यांचे उद्घाटन होणार आहे.

स्मार्ट पोलिस ठाणे अंतर्गत नागरिकांना ठरवून दिलेल्या सेवा, २४ तास पुरवण्यासाठी कटीबद्ध असणे, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्वोत्तम सेवा, नागरिकांच्या गरजेनुसार यशस्वीरीत्या राबविणे, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर प्रस्थापित करणे, कार्यप्रणालीत वेळोवेळी सुधारणा करणे, पोलिस ठाण्यांचा परिसर स्वच्छ असणे, इमारत सुसज्ज असणे, पोलिस ठाण्यामधील सर्व अभिलेख अद्ययावत असणे, पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट केलेल्या कार सेवेच्या ‘त्या’ फोटोवर राऊतांनी उपस्थित केला सवाल; म्हणाले, “तुम्ही…”

काय बदल होणार

राज्य सरकारकडून पोलिस दलाला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाने स्मार्ट पोलिस ठाण्याची संकल्पना पुढे आणली आहे. सर्व कर्मचाऱ्यांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन असावेत, तसेच त्यांना इंटरनेट वापरण्याचे कौशल्य असावे, अशी या योजनेतील वैशिष्ट्ये आहेत. कागदपत्रांची जागा सॉफ्ट कॉपीने घेतली की कामकाजही गतिमान होईल. तक्रारदाराला किंवा अर्जदाराला पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत,

दाखले परवानग्या ऑनलाईन मिळणार

सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्यात जाण्यास तयार नसला तरी नोकरी, पासपोर्टसाठी आवश्यक असलेली चारित्र्य पडताळणी, शस्त्र परवाने, सांस्कृतिक कार्यक्रमांची परवानगी, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनीक्षेपकाची परवानगी, उपोषण, मोर्चे, सार्वजनिक सभा यांच्यासाठी पोलिस ठाण्यात पत्रव्यवहार करावाच लागतो. यासाठी फेऱ्या मारूनही कामे वेळेवर होत नाहीत. वास्तविक हे काम ऑनलाइन शक्य आहे. त्यासाठी ही कामे आता ऑनलाईन पध्दतीने होऊ शकणार आहेत.

हेही वाचा : राम मंदिरासाठी वडिलांनी लाठ्या खाल्ल्या, रोहिणी खडसे यांचा दावा

“जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये स्मार्ट झाली आहेत. येत्या काही दिवसांत ही स्मार्ट पोलीस ठाणी शंभर टक्के कार्यान्वित केली जातील. प्रशासकीय गतिमानता, पारदर्शकता, कामाची गुणवत्ता वाढण्यास यामुळे मदत होईलच पण दप्तर दिरंगाईला आळा बसेल. पोलीसांच्या कामाला तंत्रज्ञानाची जोड असेल”, असे रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad district all police stations became smart with the modern technology css
Show comments