इरशाळवाडी दरड दुर्घटनेला दरड दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या काळरात्रीच्या आठवणी आजही गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. निसर्गाच्या प्रकोपातून सावरण्यात यश आले असले तरी आजही दरडग्रस्त कुटूबांतील लोकांच्या मनात या आघाताच्या जखमा घर करून आहेत. दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही या गावातील आपदग्रस्तांचे पुर्नवसन होऊ शकलेले नाही. त्यामुळे ऊन वारा आणि पावसाचा मारा सहन करत ग्रामस्थांचा परिस्थितीशी संघर्ष सुरु आहे.

१९ जुलै २०२३ ला रात्री साडे दहाच्या सुमारास खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवर भली मोठी दरड कोसळली. या ४५ या दरडीखाली गाढली गेली होती. या दुर्घटनेत ८४ जणांचा मृत्यू झाला. या भिषण दुर्घटनेच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात घर करून आहेत. दुर्घटनेनंतर गावाचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती. आपदग्रस्त गावकऱ्यांनी सिडको मार्फत अत्याधुनिक घरे बांधून दिली जातील असेही जाहीर केले होते. वर्षभरानंतरही आपदग्रस्त कुटूंबांचे पुनर्वसन मार्गी लागू शकलेले नाही. त्यामुळे आपदग्रस्त कुटूंबांना तात्पुरत्या निवाऱ्यात राहण्याची वेळी आली आहे.

हे ही वाचा… अग्रलेख: स्थलांतराची शिडी; वर्गवादाचा साप!

ज्या डोंगराच्या आंगाखांद्यावर आम्ही खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो, वास्तव्य केले तो डोंगरच आमच्या जिवावर उठेल यांची कल्पनाच नव्हती. १९ जुलै २०२३ चा दिवस जिवनातील काळेकुट्ट दिवस होते. त्या दिवसाची आठवण झाली तरी दचकायला आणि घाबरायला होते. केवळ दैवबलबत्तर होते म्हणूनच आम्ही वाचलो असल्याचे हे आपदग्रस्त सांगतात.

या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. ५७ जण बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करण्याची प्रक्रीय पूर्ण झाली असली तर त्या मृतांचे दाखले अद्याप नातेवाईकांना मिळालेले नाही. बेघर आणि बेरोजगार झालेल्या कुटूंबियांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटलेला नाही. गावातील २२ मुले कायमही अनाथ झाली. त्यांना अपेक्षित सुविधा मिळू शकलेल्या नाहीत.

हे ही वाचा… Mumbai Rains Update : मुंबईसह आसपासच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, लोकल वाहतूक मंदावली

आज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांना आज श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना अनावर झाल्या. आप्त स्वकियांच्या आठवणीत त्यांनी आपल्या आश्रूंना बांध मोकळे करून दिले. अनेकांना यावेळी गहिवरून आल्याचे दिसून येत होते. यावेळी प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसिलदार आयुब तांबोळी, निवासी तहसिलदार सुधाकर राठोड, पोलीस प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

त्या दिवसाची आठवण झाली तरी दचकायला आणि घाबरायला होते. केवळ दैवबलबत्तर होते म्हणूनच आम्ही वाचलो. पण जिवाभावाची माणसं कायमची गमावली आहेत. – कमळु पारधी, आपदग्रस्त

दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या घरांचे वाटप केले जाईल. आपदग्रस्तांना चांगली आणि सुविधायुक्त घरे देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. – उदय सामंत पालकमंत्री