रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील बारसू रिफायनरी प्रकल्प होण्यावरून सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नानार बारसू रिफायनरी प्रकल्पाला यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला होता. ठाकरे गटाच्या विरोधापाठोपाठ शिंदे गटाने विरोध केल्याने या प्रकल्पाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत बारसू रिफायनरी प्रकल्प हा होणारच असे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. याबरोबर या प्रकल्पाचा विषय संपला असल्याचे राजापूरचे विद्यमान आमदार किरण सामंत यांनी जाहीर केल्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विषयामध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच मत भिन्नता असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजापूर तालुक्यामधील नाणार बारसू या ठिकाणी होणाऱ्या रिफायनरी प्रकल्प विरोधात स्थानिकांचा मोठा विरोध आहे. मात्र माजी आमदार प्रमोद जठार यांनी हा रिफायनरी प्रकल्प व्हायला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी राजापूर मधील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ असलेल्या लोकांची बैठक बोलावली. यावरून रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारसू रिफाईने प्रकल्पाविषयी माजी आमदार जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नाणार बारसू मध्ये हा प्रकल्प आठ ते दहा हजार एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे. केंद्राकडून राज्य शासनाकडे हा प्रकल्प आल्यानंतर तो राजापुरात उभारावा अशी भूमिका केंद्र आणि राज्य सरकारचे आहे. त्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी राजापुरातच हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे दोन ते अडीच लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विद्यमान आमदार किरण सामंत यांना हा प्रकल्प किती गरजेचा आहे, हे समजावून सांगण्याचे काम आम्ही करणार असून या प्रकल्पाविषयी एक शिष्ट मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत आणि हा प्रकल्प राजापुरात होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. २०१७ पासून बारसू प्रकल्पाचे काम रखडलेले होते. ते आता कार्यान्वित करण्यात येणार आहे. भाजप सरकारने केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. यासाठी खासदार नारायण राणे आणि कोकणातील सर्व आमदार एकत्र येऊन हा प्रकल्प मार्गी लावणार आहेत. कोकणाच्या विकासासाठी हा प्रकल्प असून रोजगारीसाठी होणारे स्थलांतर या प्रकल्पामुळे थांबणार आहे. स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास

राजापूरतील बारसू नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांमध्ये भिन्नता दिसून आले नाही या प्रकल्पाच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना हा प्रकल्प लवकरच मध्य प्रदेश किंवा गुजरात या ठिकाणी हलवण्याच्या हालचालीला वेग आला आहे. सत्ताधारी पक्षां मधीलच नेत्यांनी बारसू प्रकल्पाच्या विषयी व्यक्त केलेल्या मतांमुळे जिल्ह्यातील नागरिक संभ्रमावस्थेत सापडला आहे.

राजापूर तालुक्यामध्ये रिफानरी प्रकल्प होणे गरजेचे असून यातून बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. कोकणात लाखो मुलं रोजगारासाठी बाहेर जात आहेत. हा प्रकार थांबून मुलांना येथेच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आम्ही आमच्या एकरी जमिनी कंपनीला द्यायला तयार झाला आहोत. – प्रल्हाद तावडे… जमीन मालक

हेही वाचा : Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

रोजगार चा प्रश्न सुटता महत्त्वाचा असो माझ्या घरातच माझी मुलगी बीएससी होऊन घरी बसले आहे. आज तिला रोजगार मिळवणे अवघड झाले आहे. मात्र हा प्रकल्प आल्याने स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे.. – सदाशिव तांबडे… जमीन मालक

रिफायनरी समर्थकाची रत्नागिरी मध्ये बैठक प्रमोद जठार घेत आहेत. त्याबाबत लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले की, याबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नाही. रिफायनरी हा विषय संपलेला आहे. तरी प्रमोद जठार यांनी का बैठक बोलावली या बाबत माहिती घेतो असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ratnagiri bjp shivsena mahayuti dispute on barsu oil refinery project css