सांगली : संततधार पावसाने कृष्णा, वारणा नद्यातील पाणी पातळी वाढल्याने महापूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून रविवारी सकाळपासून २५ हजार क्युसेकने विसर्ग वाढवून सव्वा लाख क्युसेक करण्यात आला आहे. सांगलीमध्ये आयर्विन पूलाजवळ १७ फूट ३ इंच झाली असून बारा तासात १ फूट ९ इंचाने पातळी वाढली आहे.

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असून दोन्ही नद्या आता पात्राबाहेर पडल्या आहेत. कृष्णा नि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवत तो ६५ हजार क्युसेक वरून विसर्ग आज सकाळी आठ वाजल्यापासून १ लाख २५ हजार क्युसेक करण्यात आला. कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी १७ फूट ३ इंचावर आहे. तर शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये गेली तीन-चार दिवस सततधार पावसाची सुरुवात आहे.

हेही वाचा : चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार! दोघांनी चित्रिकरण करुन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर केला व्हायरल

या परिसरातील नदी, नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे या वारणा नदीवरील बहुसंख्य बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. काखे-मांगले पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

काही ठिकाणी वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकात नदीचे पाणी शिरले आहे. सध्या चांदोली धरण ७१टक्के भरले असून १५९२ क्युसेकने पाणी वारणा नदी पात्रात सोडले जात आहे. दरम्यान, दुपारी अडीच वाजेनंतर अलमट्टी धरणातून विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.