सातारा : नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरण उद्ध्वस्त होणार असून जैवविविधतेची मोठी हानी होणार असल्याचे प्रसिद्ध वनस्पतिशास्त्र अभ्यासक आणि निसर्ग तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्प प्रारूप आराखड्यासंदर्भात चर्चासत्र पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, सुधीर सुकाळे, शौनक कदम, यशवंत आगुंडे, पांडुरंग गोरे यांच्यासह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाचूळकर यांनी सांगितले की, या आराखड्याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. या आराखड्यात अनेक चुका दिसत असून बरीच चुकीची माहिती सादर केली आहे. हा आराखडा पूर्णपणे इंग्रजी भाषेत असून स्थानिक नागरिकांना तो समजणार नाही याची काळजी एमएसआरडीसी ने घेतलेली दिसत आहे. दरम्यान या आराखड्याच्या प्रती विनाशुल्क ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्याव्यात, गाव पातळीवर जाऊन प्रत्येक गावातील नागरिकांबरोबर स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन आराखड्याचे वाचन करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकल्पामुळे पर्यावरण उद्ध्वस्त होणार आहे. जैवविविधतेची मोठी हानी होणार असल्याचेही डॉ. बाचूळकर यांनी सांगितले.

हेही वाचा : Sanjay Raut on Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान; म्हणाले, “तो आमच्या…”

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प होऊ घातला आहे. दरम्यान प्रकल्पाबाबतचा प्रारूप आराखडा एमएसआरडीसीकडून तयार करण्यात आला आहे. याबाबत जाहीर नोटीसही देण्यात आली होती. नोटीसीनंतर सुरुवातीचे तब्बल ११ दिवस उलटून गेले तरी तो आराखडा संबंधित कार्यालयात किंवा वेबसाईटवर कुठेही आढळून येत नव्हता. कोणी स्थानिक नागरिक मागायला गेले तर अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे देऊन आराखडा देण्यास टाळाटाळ केली जात होती. दरम्यान हा आराखडा स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचणार नाही याची एमएसआरडीसी प्राधिकरणाने काळजी घेतल्याचे गंभीर मत डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर

पर्यटनाच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे गरजेचे आहे. यापूर्वी डोंगरावर आणि डोंगर उतारावर केलेल्या विकासकामांना जलसमाधी मिळाली आहे. हा अनुभव असताना पुन्हा एकदा पर्यावरणाशी खेळ करणे चुकीचे आहे, असेही डॉ. बाचूळकर म्हणाले. यावेळी सुनील भोईटे यांनीही आपले मत व्यक्त केले.