तरडगाव: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर पावसाचे सावट आले आहे. आज तरडगाव(तरडगाव) मुक्कामी पावसाने हजेरी लावल्याने लाखो वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सातारा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे . साताऱ्यातील तरडगाव (ता फलटण) चांदोबाचा लिंब येथे आज मध्यम पावसात दुपारी साडेचार वाजता अलोट उत्साहात पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडले. लोणंद वरून अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण करून तरडगाव मुक्कामी आला. तोपर्यंत पालखी सोहळ्यावर पावसाचा जोरदार वर्षाव झाला. त्यामुळे दिंड्यांच्या मुक्कामातील राहुट्या साठी उभारलेल्या तंबूत पाणी शिरले. सगळीकडे चिखल झाला आहे.याच पावसात साडेसहा वाजता तळावर सर्व दिंड्या पोहोचल्या. पालखी तळावर चोपदारांनी दंड उंचावल्यावर सर्वत्र शांतता झाली. चोपदारांनी सूचना केल्या. समाज आरती पावसातच होऊन माऊली एक दिवसासाठी तरडगाव मुक्कामी विसावली. या पावसाने वारकऱ्यांच्या विश्रांतीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. पावसाचा अंदाज न आल्याने वेळीच खबरदारी न घेतल्याने वारकऱ्यांना चिखलातच मुक्काम करावा लागणार आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाळा समाज मंदिरे, मंगल कार्यालये, ग्रामपंचायतच्या मिळकतीमध्ये वारकऱ्यांचा मुक्काम आहे. ज्या ग्रामस्थांच्या घरी मुक्काम करता येईल तिथे वारकरी मुक्काम करत आहेत. तरीही अनेक वारकरी जागे अभावी प्रशासनाच्या मदतीच्या आशेवर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “तुमची चार माकडं…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल; थेट नामोल्लेख करत म्हणाले…

सातारा जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवा सुविधेसाठी मोठी व्यवस्था केलेली आहे. त्यांना कोणतीही अडचण भासू नये अशी काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. तरी आज अचानक आलेल्या पावसाने पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या व्यवस्थेत मोठी अडचण आली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाची शिकस्त सुरू आहे. वारकऱ्यांच्या निवासाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी फलटणच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधला असता वारीच्या ठिकाणी नेटवर्क यंत्रणा विस्कळीत होत असल्याने होऊ शकला नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यावेळी वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण त्यांच्या व्यवस्थेची खूप काळजी घेतली आहे. तरीही आज सकाळपासून पावसाचा अंदाज होता. त्यामुळे वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले आहेत. आपण वारकऱ्यांची काळजी घेत आहोत. जिथे शक्य आहे तिथे ताडपत्री टाकून कुठे काही व्यवस्था करता येते. तिथे करून वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावत आहोत. आमचे सर्व प्रशासन सध्या तरडगाव मध्ये आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara rainfall may affect sant dnyaneshwar maharaj palkhi sohla ashadhi ekadashi 2024 css
Show comments