सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ इसापूर या जंगलमय भागामध्ये शिकारीसाठी फिरत असलेल्या चौघाजणांना वनविभागाच्या गस्तीपथकाने मध्यरात्री ताब्यात घेतले.यावेळी संबंधित शिकाऱ्यांकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो सपशेल फसला.यावेळी या शिकाऱ्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिताफीने ताब्यात घेतले.

या शिकाऱ्यांकडून मृत ससा, बंदूक तसेच तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या, हे शिकारी नेहमी या जंगलमय परिसरामध्ये शिकारीला येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.यावेळी वन विभागाने ताब्यात घेतले त्यांची नावे दशरथ बाबुराव राऊळ रा. माडखोल, प्रशांत सदानंद कुबल रा. कुडाळ, अमोल नामदेव गावडे रा. खासकीलवाडा चौकूळ, सखाराम चंद्रकांत राऊळ रा. माडखोल अशी आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे वनक्षेत्रपाल शिंदे यांनी सांगितले.

याबाबत आंबोली जंगलात काही शिकारी फिरत असल्याची माहिती शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली त्यावेळी मध्यरात्री चौकुळ ईसापुर परिसरात हे चौघे संशयीत रित्या दिसून आले. यावेळी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हातात असलेल्या बंदूकीतून गोळीबार करून त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिताफीने ताब्यात घेतले . यावेळी त्यांच्याकडे आढळून आलेल्या वाहनांची तपासणी केली असता एक शिकार केलेला मृत ससा, पाच जिवंत काडतुसे,दोन बॅटऱ्या, दोन मोबाईल, एक हेडफोन आणि तीन दुचाकी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत तक्रार नोंदविली आहे.

चौकुळ इसापूर येथे हि कारवाई देवसू वनपाल मेहबूब आप्पासो नाईकवडे, वनरक्षक संकल्प दिलीप जाधव ,संग्राम पाटील वनरक्षक तपासणी नाका, आदित्य लाड वनरक्षक वेर्ले, एकनाथ पारधी, मंगेश सावंत, प्रथमेश गावडे, राकेश अमृतकर आदींच्या पथकाकडून करण्यात आली आहे

आंबोली मधील नांगरतास परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या शिकार होत आहे असे बोलले जात आहे. कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणाहून नांगरतास कावळे शेत, घाटकरवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकारी मुक्कामाला असतात त्यांना सुद्धा लगाम घालण्यात यावा व कारवाई करण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमी मधून होत आहे. याबाबत वनपरिक्षेत्रपाल यांना माहिती देण्यात आली आहे, असे निसर्गप्रेमींनी म्हटले आहे.