सावंतवाडी : सावंतवाडी – इन्सुली – बांदा – पणजी महामार्गावर धावणाऱ्या कुडाळ – पणजी एसटी बस ला इन्सुली घाटात भिषण अपघात झाला. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले. ड्रायव्हरने प्रसंगावधानता राखत गाडी उंचवटा असलेल्या भागाकडे वळविली असल्याने दुर्दैवी अपघात टळला. मात्र अपघाता पुर्वी गाडीच्या चाकाखाली काही तरी प्लास्टिकची वस्तू चिरडल्याचा आवाज आला याबाबत एसटी महामंडळाने चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला.

या बस मध्ये ४८ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे. मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. एसटी बस चालक सचिन प्रताप कुडे (४८) यांच्या छाती पोटाकडे स्टेअरिंग मुळे दुखापत झाली आहे तर वाहक दिनेश दत्ताराम शिरवळकर (४७) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

या अपघातातील जखमींमध्ये सखाराम लक्ष्मण घाटकर (७४, रा. कुणकेरी), हेमा संजय सावंत (५२, रा. पणजी), स्मिता लक्ष्मण गावडे (२१, निगुडे), सुहानी चंद्रकांत पालव (४८, इन्सुली), विद्या राजेंद्र वने (४८ साळगाव), मधुकर कृष्णा कडव ८० आंबेगाव), गोविंद केशव कदम (५६, कुंब्रल), प्रेमानंद यशवंत पालेकर (५२, पाळये दोडामार्ग, शंकर कदम (७२, शिवापूर), सिध्दप्पा बेळगावकर (७०,बांदा),नॅल्सी डिसोझा (७८, म्हापसा), आनंद गावडे (४९,प्रियोळ), सौ लक्ष्मी परब(४८, भालावल), गोविंद वेलीप (५९, काणकोण), कु.प्रेक्षा दळवी (१२, होडावडे),सरीता मेस्त्री (४२, बांदा),सौ सुचिता परब (४५, इन्सुली क्षेत्रफळ), सुगंधा धुरी ( इन्सुली धुरीवाडी), लक्ष्मण मोरजकर ( ७७, नेरूर), लक्ष्मी राणे (५९, इन्सुली क्षेत्रफळ),अनिता कुंभार (कोलगाव),कु पलक सुरेश मयेकर (२०,निगुडे), हेमंत पालयेकर (४०, मोरगाव), अब्दुल जब्बार (२५, इन्सुली), गौरव सुतार (२२, झाराप), रंगा जाधव (७०, म्हापसा), संजय सावंत (५२, म्हापसा), काजल बहीरे (२०, निगुडे), शंकर परब (३२, झाराप), सखाराम भिंगारे (५०, कुडाळ) आदी किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, बांदा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बडवे, यांनी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच वाहकाकडून घटनेची माहिती घेतली. उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींना मदत कार्यात सामाजिक बांधिलकी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ गिरीश चौघुले यांच्याकडे उपचाराबाबत विचारपूस केली. तसेच जखमींना काही मदत हवी आहे किंवा कसे? ही चौकशी केली. दरम्यान सावंतवाडी व बांदा एसटी महामंडळाचे अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि विचारपूस केली.

… तो आवाज कसला?

इन्सुली घाटात एसटी बस ला अपघात होण्यापूर्वी एक आवाज आला. एखादी प्लास्टिक वस्तू चिरडल्याचा आवाज येतो तसा फट आवाज आला आणि पुढे गाडीला अपघात झाला असे एक जखमी शंकर कदम यांनी बोलताना सांगितले. दरम्यान सीएनजी च्या जुन्या बस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर घालण्यात आल्या आहेत. ब्रेक मारल्यावर आवाज येतो असे काही जणांनी सांगितले. तर इन्सुली घाटात एसटीचा ब्रेक दाबताच आवाज आला आणि एसटी बस ब्रेक फेल झाली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या साऱ्या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रवासी वर्गातून करण्यात आली आहे.