सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच भातपीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पावसाने उघडीप साधली होती. आता परतीच्या पावसाने सोमवारी दुपारपासून धुवांधार हजेरी लावली असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे.

गौरी गणपती सणाच्या काळात अधुनमधून मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने उघडीप साधली होती. मात्र सोमवारी दुपारपासून धुवांधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.तर भातपीक कापणीचा हंगाम सुरू होत असताना पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Akshay Shinde Encounter :”अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारण्यापेक्षा थेट…”, उदयनराजेंची तीव्र प्रतिक्रिया

सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यात झालेल्या ढग फुटी सदृश पावसाने भुईबावडा आणि करूळ घाटाची दणादण उडाली आहे. दरडी कोसळल्या तर संपूर्ण घाटातील गटारे दगड मातीच्या गाळाने भरली आहेत. तर ठिकठिकाणी मोऱ्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळ पासून घाटातील वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. आज घाट रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला.करूळ घाटही बंद असल्यामुळे राधानगरी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.