सोलापूर : मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे आणि यंदा पावसाळा सुरू होताना ७ जून रोजी वजा ६० टक्के इतक्या नीचांकी पाणीसाठा राहिलेल्या उजनी धरणात बुधवारी, ३ ऑक्टोबर रोजी १२२.५० टीएमसी एवढा प्रचंड पाणीसाठा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पूर नियंत्रणाकरिता गेल्या दोन महिन्यांत धरणातून १०६ टीएमसीपेक्षा जास्त पाणी भीमा नदीवाटे सोडण्यात आले आहे. दुसरीकडे उजनी धरणात पाण्याचा भरपूर साठा असल्यामुळे धरणावर कार्यरत असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून एक कोटी ७४ लाख युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. त्याची किंमत सुमारे सहा कोटी एवढी आहे.

मागील वर्षी कमी पाऊसमानामुळे उजनी धरण अत्यल्प प्रमाणात भरले होते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठ्याची स्थिती होती. नंतर हिवाळ्यात जानेवारी महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठा वजा पातळीत आला. गेल्या ७ जून रोजी पावसाळ्याला प्रारंभ होत असताना धरणात वजा ५९.९९ टक्के इतका निचांकी पाणीसाठा होता. परंतु, यंदाचा पावसाळा समाधानकारक राहिल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने भरत गेला. २५ जुलैपर्यंत वजा पातळीत राहिलेले हे धरण ५ ऑगस्ट रोजी ९० इतक्यापर्यंत भरले होते. शिवाय, धरणाच्या वरील भागातून म्हणजे सह्याद्रीच्या घाटमाथ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येऊन मिसळत होते. त्यामुळे पूर नियंत्रणाकरिता धरणातून भीमा नदीत प्रथम २० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात होते. नंतर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. धरणातून भीमा नदीसह त्यावर अवलंबून असलेल्या विविध सिंचन योजना, कालवे प्रकल्पांसाठी पाणी सोडण्यात आले. ५ ऑगस्टपासून आज ३ ऑक्टोबरपर्यंत सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत पूर नियंत्रणाकरिता धरणातून १०६ टीएमसी एवढे प्रचंड पाणी सोडण्यात आले आहे. धरणाची एकूण पाणी साठवून क्षमता ११७ टीएमसी असून त्यात आणखी सहा टीएमसी पाणी जास्त साठू शकते.

हेही वाचा : “स्थानिक नेत्यांनी आरोपीला मदत केली, पण आम्ही…”, पुण्यातील वानवडी येथील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

सध्या उजनी धरणात १२२.५० टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. यात उपयुक्त पाणीसाठा ५८.७५ टीएमसी आहे. दुसरीकडे दौंडमार्गे उजनी धरणात अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच असून तो सात हजार क्युसेकपेक्षा जास्त आहे. तर धरणातून भीमा नदी वाटे तसेच सीना- माढा जोड उपसा जलसिंचन योजना, दहिगाव उपसा जलसिंचन योजना तसेच अन्य योजनांसह विद्युत निर्मितीकरिता एकूण ६६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

हेही वाचा : सातारा: खटाव तालुक्यात ज्येष्ठाचा चिमुरडीवर अत्याचार, घटनेने संताप; आरोपीला कोठडी

वीज निर्मिती

उजनी धरणावर जल विद्युत प्रकल्प कार्यान्वित असून यंदा पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे दररोज तीन लाख युनिट विजेची निर्मिती होत आहे. ४ ऑगस्टपासून आजतागायत एक कोटी ७४ लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे. त्याची अंदाजे किंमत सहा कोटी एवढी आहे. महावितरण कंपनीकडून प्रति युनिट साडेतीन रुपये दराने ही वीज खरेदी केली जाते. काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणीमुळे दोन दिवस वीज निर्मिती बंद होती. यंदाच्या वर्षी उजनी धरणावरील जलविद्युत प्रकल्पाद्वारे साडेतीन कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.