सोलापूर : विविध फायनान्स कंपन्यांच्या नावाने आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून अकलूजमधील मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ९७ लाख ४८ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक कैलास करडुले (वय ४५, रा. खेड, पुणे), श्रीधर नागरगोजे (वय ४८, रा. नागदरा, घाटनांदूर, जि. बीड), मनोज टकले (वय ३९, रा. केज. जि. बीड), विजय रामचंद्र जाधव (वय ३८, रा. निमगाव, ता. माळशिरस) आणि अंकुश धाकडे (वय ४०, रा. अमरावती, जि. अमरावती) अशी या आर्थिक गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. याबाबत फसवणूक झालेल्या अमित मोहन रणनवरे (रा. मांडकी, ता. माळशिरस)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार १२ डिसेंबर २०२२ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अकलूजमध्ये एका हॉटेलात आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.

हेही वाचा : Ratan Tata : “मग कुत्रे कुठे जातील?”, बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरणावेळी रतन टाटांना चिंता; एन. चंद्रशेखर यांनी शेअर केली जिव्हाळ्याची आठवण!

आरोपी अशोक करडुले व इतरांनी क्युस्टरा फायनान्स, क्यू पे आणि आलियन्स सोल्युशन या तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने ओळखीच्या व्यक्तींना गाठून आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना राबविली. आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास आकृष्ट करण्यात आले. त्यानुसार फिर्यादी अमित रणनवरे यांच्यासह नागनाथ पांडुरंग जानकर, शिवाजी ठवरे, ज्योतीराम नलवडे, अजित कदम, एन. डी. खरात, अनिस मुलाणी, चैतन्यकुमार देवकते, राहुल देशमुख, शशिकांत रणनवरे, रोहित भुजबळ आणि इतरांकडून मिळून एकूण एक कोटी १३ लाख ३३ हजार रुपये गुंतवण्यात आले. त्यानंतर सुरुवातीला नागनाथ जानकर व त्यांच्यामार्फत जोडले गेलेल्या गुंतवणूकदारांना मुद्दल आणि परतावा मिळून १४ लाखांची रक्कम कंपनीने दिली. परंतु नंतर उर्वरित ९७ लाख ४८ हजार रुपयांच्या देय रकमा गुंतवणूकदारांना परत करण्यास कंपनीने टाळाटाळ सुरू केली. यात संबंधितांनी जबाबदारी ढकलली. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कंपनीच्या संबंधित संचालकांचा पोलीस शोध घेत आहेत.