सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र जोरात पडलेल्याअवकाळी पावसामुळे शहरात नाल्यामध्ये वाहून गेल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे ग्रामीण भागात ज्वारीसह मका, गहू, द्राक्षे व अन्य पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शहरात झालेल्या धुंवाधार पावसामुळे कुंभार वेस भागातील नाल्यात सलाम साबीर दलाल (वय ३५, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) हा तरूण वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडला आहे. पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाचा जोर वाढला असताना पाऊस अंगावर झेलत सलाम दलाल हा दुचाकीने घरी परत येत होता. परंतु कुंभार वेशीतील नाल्यातून पाणी रस्त्यावर आले असताना दुचाकी घसरल्याने सलाम दलाल हा कोसळला.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत सलाम दलाल यास तीन महिन्यांच्या तान्हुल्या बाळासह तीन मुले असून ती अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या २६/११/ च्या दिवशी दहशतवादी हल्ल्यात त्याचे वडील साबीर दलाल हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दहशतवाद्याची गोळी लागल्याने जखमी झाले होते. या घटनेस दोनच दिवसांपूर्वी १४ वर्षे पूर्ण झाली होती. काही महिन्यापूर्वी त्यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचाही अवकाळी पावसाने बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : CM शिंदेंबद्दल आक्षेपार्ह विधान, १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; दत्ता दळवी म्हणाले, “आनंद दिघेंनी…”

सोलापुरात मंगळवारी संध्याकाळी सातनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरा पावसाने जोर धरला होता. या पावसाचा जोरदार तडाखा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला असून त्यात मोठ्या प्रमाणात कांदा भिजला आहे. आधीच कांद्याची आवक वाढल्याने कांदा दर कोसळले आहेत. यातच कांदा पावसात भिजल्याने दरात आणणी घसरणीची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान असताना अखेर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असताना त्या पाठोपाठ रब्बी हंगामातही पावसाने साथ न दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. ज्वारी, गहू आदी पिकांना मात्र पोषक वातावरण दिसत असताना आजच्या पावसाने ज्वारी, गहू, मका, हरभरा, द्राक्षे, कांदा आदी पिंकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

हेही वाचा : ओबीसी आंदोलनात शिंदे गटही सक्रिय,मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे महत्त्वाची जबाबदारी

यातच वादळी वाऱ्यांची भर पडल्याने शेतकऱ्यांपुढील संकट अधिक गहिरे झाले आहे. ज्वारीचे कोठार मानल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात हेच चित्र दिसून आल्यामुळे तेथील शेतकरी धास्तावला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरात अवकाळी पावसाचा फटका बसला. सांगोला-३१, अक्कलकोट-२८.२, माढा-२७.४, करमाळा-२५.४, उत्तर सोलापूर-२४.५, माळशिरस-२३.६, मोहोळ-२३.१, बार्शी-२३, पंढरपूर-२०.३, मंगळवेढा-१७.७ आणि दक्षिण सोलापूर-१२.८ याप्रमाणे एकूण सरासरी २५ मिलीमीटर अवकाळी पावसाची आकडेवारी आहे.