२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वात आधी बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर कर्नाटकमधील बंगळुरू येथे दुसरी बैठक पार पडली. याच बैठकीत विरोधी पक्षाच्या आघाडीचं 'INDIA' असं नामकरण करण्यात आलं. यानंतर आता विरोधी पक्षांची तिसरी बैठक मुंबई येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. आज मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी 'INDIA'च्या तिसऱ्या बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी खासदार राऊत म्हणाले, "आज मुंबईत मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. पाटणा आणि बंगळुरूनंतर आता मुंबईत 'इंडिया' गटाची तिसरी बैठक पार पडणार आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईच्या 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. ३१ ऑगस्टला सायंकाळी ही बैठक सुरू होईल आणि १ सप्टेंबरलाही बैठक सुरूच राहील. १ तारखेला साडेदहा वाजता बैठकीला सुरुवात होईल आणि ३ वाजेपर्यंत ही बैठक संपेल. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल." संजय राऊत पुढे म्हणाले, "मुंबईच्या बैठकीचं यजमानपद शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करणार आहोत. पण कार्यक्रमाचं यजमानपद शिवसेनेकडे (ठाकरे गट) असेल, असं आमचं ठरलं आहे. प्रत्येकाकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतील? याचं वाटपही झालं आहे. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे ही बैठकी यशस्वीपणे पार पडेल. आजच्या बैठकीला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि अनिल देसाई उपस्थित होते. लवकरच आम्ही पुढल्या कामाला सुरुवात करू." हेही वाचा- माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा… "या बैठकीला देशातील किमान पाच राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख नेतेही या बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळे आम्हाला सरकारचंही सहकार्य हवं आहे. कारण अनेकांची सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला सहकार्य करावं, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल", असंही संजय राऊत म्हणाले.