सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा करोनाच्या संकटाचा सामना करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे. देशात करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून याआधी आलेल्या दोन लाटांमध्ये फार मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान दुसऱ्या लाटेतून वाचलो असल्याने तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे असं वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात बोलताना त्यांनी तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचंही म्हटलं. यावेळी त्यांनी हसत हसत जगा असा उपदेशही दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते म्हणाले की, “डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले,” असं यावेळी त्यावेळी सांगितली. यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपे म्हणाले, “मी त्यांना…”

“गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलोय, कीर्तनकाराच्या पुढे वाकलोय…ते पुण्य आपल्याला २०२१ मध्ये कामाला आलं. त्यामुळे हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही. गळ्यात हात घालून फिरण्याची गरज नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “आता सगळं क्षणिक आहे. उद्याचं किर्तने होईल का याची शाश्वती नाही. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय. काही लोकं खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत. त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा”.

“माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट”

“दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच करोनावरील औषध असल्याचं म्हटलं.

मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही- इंदुरीकर महाराज

याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केलं होतं. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

“ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indurikar maharaj kirtan covid third wave in latur sgy