सावंतवाडी: भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आय.एन.एस.गुलदार ‘ ही युद्धनौका काल शनिवारी दुपारी विजयदुर्ग बंदर जेटीवर दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे म्हणून खास युद्धनौका आयएनएस गुलदार आणण्यात आली आहे.
यासाठी विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली आणि त्याची त्वरीत कार्यवाही करण्यात आली. भारतीय नौदलाचे निवृत्त आय.एन.एस.गुलदार जहाज कारवार नौदल तळ येथे होते. ८१ मीटर लांब आणि १२०० टन विस्थापन असलेली ३० मिमी क्लोज रेंज गन आणि राॅकेट लाँचर्सने सुसज्ज असलेली आय.एन.एस.गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आता स्थिरावली आहे. ३० डिसेंबर १९८५ साली ही युद्धनौका नौदलात समावेश करण्यात आली. युद्धसज्जतेव्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरलं जात होतं. अशी ही महत्त्वपूर्ण युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विशेष प्रयत्न केले.
आरमारी विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो संख्येने येणारे पर्यटक याचा लाभ घेऊन जिल्ह्याचे पर्यटन वाढीसाठी हा एक प्रयत्न केला आहे. विजयदुर्ग खाडी ही सुमारे ४२ किलोमीटर लांबीची असून ४० ते ५० मीटर खोल आहे. दरम्यान, नागमोडी वळण आणि खाडीच्या दुतर्फा डोंगर असलेली ही सुरक्षित खाडी वादळी परिस्थितीतही नौकांना उपयुक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आरमारी गनिमी काव्यासाठी हे मोक्याचे ठिकाण होते. आजही ते त्यासाठी ओळखले जाते.
सन २००५ साली विजयदुर्ग किल्ल्याचा अष्टशताब्दी किल्ले महोत्सव पार पडला. त्यामुळे येथील पर्यटन वाढले असून किल्ले विजयदुर्ग, आरमारी गोदी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र अशा प्रकारचा पर्यटनात्मक प्रकल्प आल्यास पर्यटन अधिकाधिक वाढून रोजगार निर्मिती होईल. विजयदुर्ग हे शिवकालीन आरमार केंद्र असल्याने हे जहाज विजयदुर्ग बंदरातच कायमस्वरूपी उभे रहाण्यासाठी आरमाराची राजधानी असलेल्या विजयदुर्गलाच प्राधान्य द्यावे अशी भावनिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.