Devendra Fadnavis Israel Hamas War : इस्लायल-हमास युद्धामुळे संपूर्ण जगाची दोन गटांत विभागणी झाली आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि भारतासह अनेक शक्तीशाली राष्ट्रांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या राष्ट्रांनी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दुसऱ्या बाजूला, लेबनान, इराण, सौदी अरब, जॉर्डनसारखी मुस्लीम राष्ट्रं पॅलेस्टाईनच्या बाजूने उभी आहेत. रशियानेही पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून भारत या युद्धात इस्रायली जनतेच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे असा संदेश दिला आहे. परंतु, आपल्या देशातील काही संघटना आणि पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅलेस्टाईनच्या समर्थनात काही संघटनांनी उत्तर प्रदेश, कोलकाता आणि चेन्नईत मोर्चे काढल्याचं अलिकडेच पाहायला मिळालं. त्याचबरोबर काही पक्षांनीदेखील पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनात भूमिका मांडली आहे.

एका कार्यक्रमात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना म्हणाले, जिथे युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे आधी अतिक्रमण करण्यात आलं आणि मग इस्रायल देश उदयाला आला. मला या प्रकरणाच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) मात्र यावेळी इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. पंतप्रधानांची भूमिका काहीही असो, परंतु, आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असायला हवी.

या वक्तव्यानंतर शरद पवार हे भाजपा नेत्यांच्या टीकेचे धनी बनले आहेत. अनेक भाजपा नेत्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पवारांवर टिकास्र सोडलं आहे. फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात फडणवीसांनी म्हटलं आहे, इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवादाचा विरोध केला आहे. मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, दहशतवादाला भारताने कायमच कडाडून विरोध केला आहे.

हे ही वाचा >> गाझामधील रुग्णालयावर हल्ला कोणी केला? इस्रायलमध्ये दाखल होताच जो बायडेन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

फडणवीस यांनी म्हटलं आहे, इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले गेले, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला. शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: २६/११ च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war devendra fadnavis slams sharad pawar for standing with palestine asc
Show comments