रत्नागिरी : रत्नागिरीतील कट्टर शिवसैनिक तसेच रत्नागिरीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी शनिवारी पालकमंत्री उदय सामंत याच्या उपस्थितीत शिवसेना (ठाकरे) गटाला धक्का देत शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

आबा घोसाळे यांच्या या प्रवेशाबाबत बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेची नाचणे ही पहिली ग्रामपंचायत त्यांनी निवडून आणली. त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाला फायदाच होणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा – महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील

पक्ष पक्षप्रवेशाच्या वेळी जयसिंग (आबा) घोसाळे म्हणाले की, आता आम्ही पालकमंत्री उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. रत्नागिरी तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचे यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा – रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विरहित; २० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार – उदय सामंत

जयसिंग (आबा) घोसाळे यांच्या समवेत त्यांचे भाऊ अनिल घोसाळे, अमोल घोसाळे, विक्रांत घोसाळे, अमित घोसाळे, अक्षय भाटकर, अतुल घोसाळे, गजेंद्र नाईक, उदय नागवेकर, विश्वजित चौगुले, सचिन वायंगणकर, महेश डोंगरे, बाळकृष्ण घोसाळे, संदेश भाटकर, आकाश भाटकर, मंथन भाटकर, आरोही घोसाळे, मंदार घोसाळे, यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी तालुका प्रमुख बाबू म्हाप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बंटी किर आदी पदाधिकारी उपस्थित होते.