गेल्या दोन दिवसांपासून राज्याच जालन्यातील मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीहल्ला टीकेच्या केंद्रस्थानी असून विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. खुद्द सरकारी पातळीवरून याची दखल घेत संबंधित पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे जालन्यात मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण चालूच आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फडणवीसांच्या गृहखात्यालाच महाराष्ट्रात पेटवापेटवी करायचीये का?”

या सर्व प्रकरणावरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून थेट फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “पोलिसांनी आंतरवालीमध्ये बळाचा जो अतिरेकी वापर केला, तो पाहता राज्यातील मिंधे सरकारला व फडणवीसांच्या गृहखात्यालाच मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्रात पेटवापेटवी करायची आहे काय? असा प्रश्न शांततेने आंदोलन करणाऱया मराठा समाजाला व महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला आहे. कारण लाठीहल्ला करावा, गोळीबार करावा असे तर आंतरवालीत काहीच घडले नव्हते”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“आंतरवालीत पहिली आग सरकारने लावली”

दरम्यान, जालन्याच्या आंतरवाली गावात घडलेल्या प्रकारासाठी ठाकरे गटानं राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. “जाळपोळीच्या घटनांचे कुणीही समर्थन करणार नाही; पण आंतरवालीत पहिली आग सरकारने लावली, हे विसरता येणार नाही. आंदोलनाच्या चार दिवसांत आंतरवाली गावात एकदाही अनुचित प्रकार घडला नव्हता. सारे काही लोकशाही मार्गाने व शांततेने सुरू असताना हे आंदोलन उधळून लावण्यासाठी सरकारने राक्षसी बळाचा वापर करण्याचे कारणच काय?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत; पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

“…म्हणून सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला”

दरम्यान, जालन्यातील आगामी शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठीच सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा मिंधे सरकारचा भंपक कार्यक्रम येत्या ८ तारखेला जालना येथे होणार आहे. त्या कार्यक्रमात आंतरवाली सराटीच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद उमटू नयेत, म्हणून शांततेने सुरू असलेले हे आंदोलन चिरडण्याचा निर्णय सरकार पातळीवर झाला आणि तसे निर्देश फडणवीसांच्या गृहखात्याने पोलीस यंत्रणेला देले”, असं अग्रलेखाच नमूद करण्यात आलं आहे.

“हा दिल्ली दरबारचा फॉर्म्युला”

“सरकारविरुद्ध उठणारा कुठलाही आवाज असो वा आंदोलन, ते हुकूमशाही पद्धतीनं चिरडून टाकणे किंवा सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकणे, हा ‘दिल्ली दरबार’चा फॉर्म्युला आता मिंध्यांच्या सरकारनेही राबवायचे ठरवलेले दिसते. मराठा आंदोलक सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मिंध्यांकडे आहे काय?” असा सवाल ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalna maratha protest violence uddhav thackeray faction targets devendra fadnavis pmw
Show comments