धाराशिव: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत सुटले आहेत. त्यामुळेच ओबीसी नेते एकत्रित येवून मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. शासनाकडे असलेल्या मराठ्याच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी भुजबळांनी लावून धरली आहे. मराठ्यांविषयी कमालीचा आकस त्यांच्या मनात आहे. भुजबळांच्या मागणीप्रमाणे मराठ्यांच्या कुणबी नोंदी सरकारने रद्द केल्यास मराठ्यांची ताकद दाखवून देवू, राज्यातील ५५ टक्के समाजावर संयम सोडायची वेळ आणू नका. अन्यथा सरकारचे अवघड होईल, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला.धाराशिव शहरात बुधवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा जागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव, महिला उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी जरांगे-पाटील म्हणाले की, आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने चार न्यायाधीश, मंत्री, सचिव, आमदार, कायद्याचे, घटनेचे आणि आरक्षणाचे अभ्यासक आणले. ज्या मराठ्याची नोंद सापडली नाही, त्या मराठ्याच्या नोंदीआधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे यावर एकमत झाले. नोंद असलेल्या आणि मागेल त्या मराठ्यांना त्या नोंदीआधाारे कुणबी प्रमाणपत्र दिले. नोंदीच्या आधारावर सगेसोयर्‍यातील मराठ्यांना म्हणजेच मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण नोंद असलेल्या आणि नोंद  नसलेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, तो म्हणजे शेती. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आपण सरकारपुढे ठेवली. ती मागणी मान्य होईलच. परंतु मराठ्यांनी आपली खंबीर साथ सोडू नये. मराठ्यांचे दुःख, वेदना दूर करायची असेल तर आरक्षण हाच सक्षम पर्याय आहे. आणि तो मिळविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा शब्दही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

हेही वाचा >>>पोलीस पाटलांंच्या भरतीचा गैरव्यवहार पोहोचला काेर्टात….कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत….

साडेतीनशे युवकांचे बलिदान वाया जावू देणार नाही. अनेक मराठा भगिनींचे कपाळ पांढरे झाले आहे. आता यापुढे पुन्हा तसे होवू द्यायचे नाही. गरीब मराठ्यांचा मुलगा आयएएस, आयपीएस झालेला आपल्याला पहायचे आहे. काळ्याकुट्ट अंधारात आत्महत्याग्रस्त मराठ्याच्या घरातील महिला रडत आहे. तिच्या मांडीवर अनाथ लेकरेही रडत आहेत. आत्महत्या झालेल्या मराठ्याच्या कुटुंबाची अवस्था सरकारने उघड्या डोळ्यांनी बघावी. तेंव्हाच त्यांना मराठा समाजाच्या खर्‍या वेदना कळतील. त्यांच्या घरातील कोणी मरत नाही तोवर त्याची जाणीव भुजबळ, फडणवीसांना होणार नाही. मराठा युवकांनी आरक्षणासाठी देह त्याग केला, हे आम्ही कदापि विसरणार नाही. भुजबळ, फडणवीस आणि सरकारनेही हे ध्यानात ठेवावे. मराठ्यांनी जातीशी एकनिष्ठ राहून लढा दिला तर, आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी नमुद केले. या सभेला मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी होती. महिला, लहान मुले आणि वृध्दांची संख्याही लक्षणीय होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jarange patals from dharashiv warn the state government if kunbi records are canceled by the government amy
Show comments