सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून वादावादी झाली. या वादामुळे भाजपत सुरू असणारी धुसफूस निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आली आहे. हा वाद आमदार गोपीचंद पडळकर व भाजप प्रचार प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या गटात झाला. दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सायंकाळी चार वाजता भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल या संदर्भात चर्चा आणि उमेदवारी बद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता.

हेही वाचा : सत्तेत राहण्यासाठी रामराजे नेहमी पक्ष बदलतात : रणजितसिंह नाईक निंबाळकर

दरम्यान, याच बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जत मध्ये भूमिपुत्रालाच संधी द्यावी असा मुद्दा मांडला. याला आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला. यावरूनच वादावादीस सुरुवात झाली. या बैठकीस भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही बाजूने खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी, प्रभारी रमेश देशपांडे, तमनगौडा रवी पाटील, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण आदींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : राजकोट येथील छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची जबाबदारी सुतारांकडे – दीपक केसरकर

जत विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर येथे इच्छुक आहेत. तर जत मधून तमन्नागौडा रवी पाटील, प्रकाशराव जमदाडे, शंकर वगरे, डॉ. आरळी आदी इच्छुक आहेत. येथे पडळकर इच्छुक झाल्याने स्थानिक भूमिपुत्र आणि पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासूनच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिल्याचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटांकडून उमेदवारी आपणालाच असा दावा केला जात आहे. शिवाय इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे.