लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडीसंदर्भात अनेक नेते गौप्यस्फोट करत आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केलं. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारही काही आमदारांबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे मागील दोन वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व घडामोडींवर भाष्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या आधी राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत इच्छा व्यक्त केली होती. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “अजित पवार अजून पाच ते सहा दिवस थांबले असते तर शरद पवार त्यांची इच्छा पूर्ण करणार होते, असं जयंत पाटील म्हणाले. ते एपीबी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : नरेंद्र मोदींचा मोठा दावा, “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणारच, हे घडल्यावर मला…”

जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याआधी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अजित पवारांनी इच्छा व्यक्त केली होती. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार यांच्या राजकीय महत्वाकांक्षाची भाजपाबरोबर जाऊन प्रगती झालेली नाही. मात्र, त्यांची प्रतिमा खराब होईल हे त्यांना माहिती असावं. तरीही त्यांना ते पाऊल उचलावं लागलं. त्यामुळे यामध्येच सर्वकाही आलं. आता प्रश्न राहिला माझ्यात आणि त्यांच्यात सुप्त राजकारण असं काही नव्हतं”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बोलताना सांगितलं होतं की, पाच वर्ष झाली आहेत. यापुढे आम्हालाही संधी मिळावी. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आणखी पाच ते सहा दिवस अजित पवार थांबले असते तर शरद पवार त्यांची ती इच्छाही पूर्ण करणार होते, अशी माझी माहिती आहे. मात्र, पक्षाच्या मान किंवा महत्वाकांक्षाची प्रश्न नव्हता. तिकडे पंतप्रधानांनी भोपाळमध्ये ७० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत भाष्य केलं आणि इकडे या सर्वांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय़ घेतला”, असं जयंत पाटील म्हणाले.

शरद पवारांना पुत्री प्रेम आहे का?

“शरद पवार यांचे पुत्री प्रेम तर आम्हाला अजिबातच अनुभवायला आले नाही. कारण तीन टर्म खासदार असलेल्या मुलीला कधीही मंत्रीपद देण्यात आले नाही. मुलीला मंत्रीपद दिले असते तर बरेच प्रसंग टळले असते. सरकार असताना शरद पवार यांनी दुसऱ्या खासदारांना संधी दिली. हे जगजाहीर आहे. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच येत नाही”, असे जयंत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil on ajit pawar sharad pawar and ncp crisis politics gkt