मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. या भक्तांसाठी शेवटच्या लोकलनंतर काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. याबाबत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. केंद्र सरकारसोबत चर्चा करुन रात्री शेवटच्या रेल्वे लोकलनंतरही भाविकांसाठी काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा- “भाजपा आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट, आम्ही…”; अमित शाहांच्या ‘भुईसपाट करा’ विधानानंतर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे मागील बुधवारी आगमन झाले आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर आपण हा उत्सव निर्बंधांशिवाय साजरा करत आहोत.

‘महोदय, मुंबईत गणेशोत्सवाची शान काही औरच असते याची कल्पना आपल्याला असेलच. श्री सिद्धीविनायक मंदिर, लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, जी.एस.बी मंडळ, गिरगावचा राजा अशा अनेक प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तर भाविक, रात्र आणि दिवसही न पाहता ८-८ तास रांगेत उभे असतात. रात्री उशिरा दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना पहाटेची पहिली रेल्वे लोकल मिळेपर्यंत वाट पहावी लागते. अशा परिस्थितीत आपण केंद्रशासनाशी चर्चा करून रात्री शेवटच्या रेल्वे लोकलनंतरही भाविकांसाठी काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत विनंती करावी. जेणेकरून गणेशभक्तांना दिलासा मिळेल’. 

हेही वाचा- “ती बाई सिगरेट पिऊन…”, चंद्रकांत खैरेंची नवनीत राणांवर टीका; उद्धव ठाकरेंचा केला होता एकेरी उल्लेख!

‘आपले सण, संस्कृती, उत्सव जपण्याचे अधिकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहेच मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे’, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Story img Loader