Jitendra Awhad : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास दोन महिने लोटले तरी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहोचलेला नाही. परिणामी स्वातंंत्र्यदिनी अनेक विद्यार्थी गणवेशविना राहिले आहेत. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. कंत्राटदार पद्माचंद मिलापचंद जैन यांनी कापलेले कापड गट शिक्षणाधिकारी कार्यालयास पुरवून त्यानंतर स्थानिक महिला बचत गटांद्वारे गणवेश शिवून शाळेत द्यायचे आहेत. मात्र, अद्यापही गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अपवाद वगळता बहुतेक शाळांना गणवेश मिळालेले नसून अनेक शाळा तर अद्याप १०० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्या बचतगटांच्या शोधात आहेत. काही ठिकाणी एकाच गटाला तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे कंत्राट देण्यात आल्याने काम रखडले आहे. गणवेशाअभावी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना साध्या कपड्यांमध्येच ध्वजवंदनाला जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. काही शाळांमध्ये गणवेश मिळाले असले तरी मळखाऊ रंग, कापडाचा दर्जा याबाबत पालक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणवेशाच्या मापातही गोंधळ आहेत. त्यामुळे आलेले गणवेश विद्यार्थ्यांना व्हावेत, यासाठी दुरुस्ती करावी लागणार असल्याची तक्रार आहे.

हेही वाचा >>लाखो विद्यार्थ्यांचा यंदाचा स्वातंत्र्य दिन गणवेशाविना! शिक्षकांची दमछाक…

यावरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज्यातील तब्बल २० जिल्ह्यांत एकही शालेय गणवेश पोहचला नाही, झेंडावंदनला नवीन कपडे सुद्धा हे सरकार शालेय मुलांना देऊ शकले नाही, किती दुर्भाग्य आपले ? कसा स्वातंत्र्यदिन त्यांनी साजरा करायचा?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सोमवारी सायंकाळपर्यंत गणवेश मिळाले नसल्याचे जळगाव, लातूर, पालघर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, पुणे, नगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांतील शिक्षकांनी सांगितले.

सर्वांना समान गणवेश

●गणवेशासाठी पालकांनी शिक्षकांकडे तगादा लावला आहे. काही शाळांमध्ये गेल्यावर्षीचा गणवेश घालून विद्यार्थी येत आहेत.

●काही गरीब कुटुंबांमध्ये तर शाळेतून मिळणारा गणवेश हेच मुलांसाठी ‘नवे कपडे’ असतात. ही बाब लक्षात घेऊन शाळा रंगिबेरंगी गणवेश निवडत असत.

●त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही नव्या गणवेशाची उत्सुकता असे. यंदा मात्र विद्यार्थ्यांचा संपूर्ण विरस झाला आहे.