राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना त्यांच्या पदावरुन हटवावे तसेच कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. राज्यभर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. असे असले तरी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून राज्यभर निदर्शने केली जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनिदेखील या प्रकरणावर बोलताना कोश्यारी यांची मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर बोलण्याची लायकी नाही. वेळ आली तर राजभवनात घुसावे लागेल, असे विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “आनंद दिघेंसोबत ज्या घटना घडल्या त्याचा मी साक्षीदार, योग्य वेळी नक्की बोलेन,” एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

“भगतसिंह कोश्यारी माफी मागा. महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बोलायची तुमची लायकी नाही. तुम्ही कोठून आले, कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री होते, याबद्दल आम्हाला काहीही देणघेणं नाही. आमच्या मराठी मातीत राहणार असाल तर परत मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल बोलल्यास याद राखा. त्यांना पळवून लावावे लागेल. वेळ आल्यास राजभवनात घुसावे लागेल. आमच्या आईबद्दल कोणी काहीही बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही,” असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा >>> राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यपालांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील भाष्य केले आहे. कोश्यारी यांच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण सारखेच आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. “या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही,” असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >>> “२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपालांच्या…”, कोश्यारींच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

राज्यपालांचे विधान वैयक्तिक- एकनाथ शिंदे</strong>

राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad criticized bhagat singh koshyari over controversial comment on mumbai prd