सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत जग्गी वासुदेव यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच राज्य सरकारने याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा - “त्या’ एका पत्राची किंमत १०० कोटी…”, बारसू रिफायनरीवरून नितेश राणेंचा ठाकरेंवर पुन्हा आरोप; म्हणाले, “मातोश्रीवर खोके…” नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? “जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा प्रसारित केली आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. 'रामदास स्वामींना भिक्षा मागताना बघून शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण केले. रामदास स्वामींच्या आदेशानेच शिवाजी महाराजांनी राज्य सोडून हाती कटोरा घेत भिक्षा मागितली', असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जातो आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. https://twitter.com/Awhadspeaks/status/1654725415330799627?t=Xu4a2IoHP5prdYWbxs0xwA&s=19 “…अन्यथा जनक्षोभ उसळेल” पुढे बोलताना, “महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल”, अशा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा - “हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, राजापूरमध्ये उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात! व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे? दरम्यान, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांच्याच आदेशाने शिवाजी महाराजांनी राज्य सोडून हाती कटोरा घेत भिक्षा मागितली, असेही ते म्हणाले. पुढे रामदास स्वामींनी स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र महाराजांना देवून त्याचा वापर राज्याचा झेंडा म्हणून करावा, असं सांगितल्याचं, या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.