बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही विरोधकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनीही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट चर्चेत आहे.

नेमकं काय म्हणाल्या नताशा आव्हाड?

“काल बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. त्याची जबाबदारी आज लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. याच गँगने एप्रिल २०२४ मध्ये माझ्या बाबांना म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांनादेखील धमकी दिली होती. गृहमंत्री म्हणून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांनी ही जबाबदारी निःपक्षपातीपणे पार पाडणेदेखील अपेक्षित आहे. मात्र ते हे करताना दिसत नाही”, असा आरोप नताशा आव्हाड यांनी केला आहे.

“…तर देवेंद्र फडवीसांच्या हेतूवर शंका निर्माण होते”

“मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना Y+ दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी मिळालेली असतानाही केवळ विरोधीपक्षात आहेत म्हणून त्यांना सुरक्षा पुरवली जात नसेल, तर देवेंद्र फडवीसांच्या हेतूवर शंका निर्माण होते”, असेही त्या म्हणाल्या.

“चांगले गृहमंत्री बनण्याची संधी फडणवीसांनी गमावली”

“देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा दुरुपयोग करत त्यांच्या लोकांना Y+ दर्जाच्या सुरक्षेची खैरात वाटत आहेत. पण विरोधी पक्षातील नेत्यांच्या जीवाला धोका असतानाही केवळ, शत्रूत्वाची भावना डोक्यात ठेवून वागत आहेत. हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे. एक चांगले गृहमंत्री बनण्याची संधी फडणवीस यांनी कधीच गमावली आहे”, अशी टीकाही त्यांनी दिली.

बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?

बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.