Vidhan Sabha Monsoon Session Maharashtra Budget 2024 : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास होत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आज विधान परिषदेत आमदार विलास पोतनीस आणि अनिल परब यांनी प्रश्न मांडला. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय. या विद्यार्थींनी इतर राज्यातील असून त्यांना  मुंबईच्या हवेतील आद्रता वाढल्यामुळे त्रास झाला असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. या उत्तरावर आमदार अनिल परब यांनी आक्षेप घेतला असून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार विलास पोतनीस यांनी सुरुवातीलाच हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, कलिना संकुलात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन महिला वसतीगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे विद्यार्थींनीच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या दर्जाहीन कामाची शासन चौकशी कऱणार का? कलिना संकुलातील वसतीगृहाभोवती झाडीझुडपी असल्याने साप वगैरे वसतीगृहात येतात. २३९ एकरावर पसरलेल्या आवारात एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थींनीची गैरसोय होते.”

यावर उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या वसतीगृहाची एकूण क्षमता १४४ आहे. २०२३-२४ मध्ये १३७ जणांनी प्रवेश घेतला आहे. एप्रिल महिन्यात अचानक काही मुलींना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. याप्रकरणी चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येक मुलीची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीतून काही निष्कर्ष काढले गेले. या वसतीगृहातील अन्न निकृष्ट आणि दूषित पाणी नाही हे आम्ही अमान्य करत नाही. परंतु, हा त्रास नव्याने मुंबईत आलेल्या मुलींना झाला होता. त्या ज्या राज्यातून मुली आल्या तेथील वातावरण कोरडे होते. तर मुंबईतील दमट वातावरम त्यांना सहन झाले नाही. त्यामुळे हा त्रास झाला”, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: पुणे पोर्श अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन; म्हणाले, “त्या मुलाला पोलीस स्थानकात…”

कलिना सर्वांत वाईट कॅम्पस

“कलिना विद्यापीठाच्या बाजूलाच मी राहतो. चार वर्षे पीएचडी करत होतो म्हणून चार तास मी तिथे बसत होतो. या देशातील सर्वांत वाईट कॅम्पस कलिना कॅम्पस आहे. ज्या तीन वसतिगृहाबाबत तुम्ही सांगताय तिथे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. तिथं दिवसा गेलात तरी साप आढळतात. वाईटपद्धतीने वसतिगृहाचा मेन्टेनस आहे. मुली कशा राहतात काय माहीत. बाहेरगावाहून आल्याने तब्येत खराब झाली हे दिशाभूल करणारं वक्तव्य आहे”, असा प्रतिवार अनिल परब यांनी केला.

हेही वाचा >> “भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर…”; लक्ष्मण हाकेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान; म्हणाले, “गावगाड्यातील सर्व ओबीसींनी…”

वसतिगृहात वॉटर प्युरिफायर बसवले

दरम्यान, आता महागनर पालिकेचं येणारं पाणी दूषित असल्याचं निदर्शनास आल्यावर ते थांबण्यात आलं. तोपर्यंत बिस्लरीचे जार त्यांना देण्यात आले. मधल्या कळात महानगरपालिकेचा दूषित पाण्याचा सोर्स ओळखून दुरुस्ती करण्यात आली. सर्व वसतिगृहात वॉटर प्युरिफायर आणले आहेत. आता जेवणासाठी चांगला टेंडर मिळालं आहे. आता जेवणाची व्यवस्था चांगली होईल”, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.