गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खारघर उष्माघात प्रकरणात पडलेल्य बळींची चर्चा पाहायला मिळत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना दोषी धरलं असून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकारकडून जरी निसर्गाला दोष देण्यात आला असला, तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता या दुर्घटनेत बळी पडलेल्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यात मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

काय घडलं होतं खारघरमध्ये?

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंनी श्रीसदस्यांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे समोर बसलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हात ६ ते ७ तास बसून राहावं लागलं. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील १४ जणांना उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकारामुळे विरोधकांनी सरकारविरोधात आगपाखड सुरू केली असताना राज्य सरकारने हे मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं म्हटलं आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना तसे दावेही केले. मात्र, आता या १४ जणांचे शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आले असून त्यांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती असं डॉक्टरांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

खारघर दुर्घटना : चेंगराचेंगरीच्या कथित चित्रफितींमुळे नवा वाद, विरोधकांची सरकारवर कडाडून टीका

काय आहे शवविच्छेदन अहवालात?

मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. अर्थात, मृत्यूपूर्वी किमान ६ ते ७ तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यासंदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय, त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न प्यायल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. कार्यक्रमस्थळी कडक उन्हात आणि उकाड्यात त्यांना बसावं लागल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती, अशी माहिती शवविच्छेदन प्रक्रियेशी संबंधित एका डॉक्टरांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

“त्यातल्या काहींना पूर्वव्याधीही होत्या. त्यांनी मृत्यूपूर्वी काही तास काही खाल्लेलं नव्हतं किंवा पाणी प्यायलं नव्हत. ४० अंश सेल्सिअस तापमानात ते तिथे बसले होते”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्री मंगलप्रभात लोढांनी दिली माहिती!

दरम्यान, या डॉक्टरांनी मृत्यूमुखी पडलेल्या १४ जणांपैकी एकाला ह्रदयाशी संबंधित आजार असल्याचीही माहिती दिली. एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन किंवा ह्रदयाशी संबंधित आजार असेल, तर अशा व्यक्तीला डीहायड्रेशनचा अधिक त्रास होऊ शकतो असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनाही अशा परिस्थितीचा जास्त त्रास होतो, असंही या डॉक्टरांनी सांगितलं. जर एखाद्या व्यक्तीला सहव्याधी असतील, तर त्यांनी जास्त काळ उन्हात असल्यास नियमित अंतराने काहीतरी खाणं किंवा पिणं आवश्यक आहे.

Story img Loader